नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये मृतदेह नदीत वाहत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (TMC Mamata Banerjee) यांनी योगी सरकारवर (Yogi Government) हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या नद्यांमधून मृतदेह पश्चिम बंगालमध्ये येत असल्याचं म्हटलं आहे. तसेच कोरोना रुग्णांचे मृतदेह असल्याने कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असल्याचं म्हटलं आहे. मृतदेहांमुळे नदीतील पाणी देखील प्रदूषित झालं आहे.
नदीचं पाणी दुषित होत असल्याने आम्ही मृतदेह नदीबाहेर काढून त्यावर अंत्यसंस्कार करत आहोत, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. "उत्तर प्रदेशमधून अनेक मृतदेह गंगा नदीच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये येत आहेत. यामुळे नदीचं पाणी प्रदूषित झालं आहे. मालदा जिल्ह्यामध्ये नदीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. यापैकी काहींवर राज्य सरकारने अंत्यस्कार केले आहेत" असं ममता यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नद्यांमध्ये अनेक मृतदेह तरंगताना दिसले होते. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये देखील येत असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना पाहणार आहेत?"; स्मृती इराणी संतापल्या
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. तसेच तृणमूलला मत न दिल्याने हत्या केल्या जात असल्याचा गंभीर आरोप देखील केला आहे. महिलांवर बलात्कार होत आहेत, पण मुख्यमंत्री गप्प आहेत. मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना पाहणार आहेत असा सवाल आता स्मृती इराणी यांनी विचारला आहे. स्मृती इराणी यांनी हायकोर्टाच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
"मी न्यायालयाचे आभार व्यक्त करते कारण छळ, खून आणि बलात्कार झालेल्या महिलांना आत्मविश्वास मिळेल, त्यांना न्याय मिळेल. मी लोकशाहीमध्ये प्रथमच पाहत आहे की मुख्यमंत्री लोकांचा मृत्यू होताना पाहत आहेत कारण त्यांनी त्यांना मत दिले नाही" असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. तसेच "आपल्या देशात पहिल्यांदा निवडणुकीच्या निकालानंतर हजारो लोक आपली घरे, गाव सोडून राज्याच्या सीमा ओलांडत आहेत. ममता बॅनर्जी आणि तृणमूलची माफी मागत आहेत. धर्म परिवर्तनासाठी तयार असल्याचे म्हणत आहेत. महिलांना घराबाहेर काढून उघडपणे बलात्कार केला जातो. 60 वर्षीय महिलेने सुप्रीम कोर्टात असे सांगितले की, 6 वर्षांच्या नातवासमोर तिच्यावर बलात्कार केला, कारण ती भाजपाची कार्यकर्ता होती. मुख्यमंत्री गप्प राहून आणखी किती बलात्कार पाहतील?" असं म्हटलं आहे.