...म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळणार; दानवेंनी सांगितली तीन प्रमुख कारणं
By कुणाल गवाणकर | Updated: November 25, 2020 18:53 IST2020-11-25T18:50:13+5:302020-11-25T18:53:04+5:30
राज्यात लवकरच सत्तांतर होणार; रावसाहेब दानवेंचा पुन्हा दावा

...म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळणार; दानवेंनी सांगितली तीन प्रमुख कारणं
मुंबई: राज्यातलं महाविकास आघाडी सरकारचं दोन महिन्यांत कोसळेल आणि सत्तांतर होईल, असा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दानवेंच्या विधानाचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी जोरदार समाचार घेतला. दानवेंना ज्योतिषशास्त्र कळतं याची माहिती नव्हती, असा खोचक टोला त्यांनी लगावला. यानंतर आता दानवेंनी त्यांच्या सत्तांतराबद्दलच्या विषयावर सविस्तर भाष्य केलं आहे.
शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणून उडवली होती खिल्ली, आता रावसाहेब दानवेंनी दिलं असं उत्तर; म्हणाले…
राज्यात दोन महिन्यात सत्तांतर कसं होणार, याबद्दल दानवेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महाविकास आघाडी सरकार त्यांच्यातल्या मतभेदांमुळेच कोसळेल, असं दानवे म्हणाले. 'जनतेची नाराजी, समन्वयाचा अभाव आणि बेबनाव ही महाविकास आघाडी सरकार कोसळण्यामागची तीन प्रमुख कारणं असतील. वैचारिक मतभेद असलेली अशी सरकारं कोसळत असल्याचं आम्ही गेल्या ३५ वर्षांमध्ये अनेकदा पाहिलं आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहारमध्ये याच कारणांमुळे सरकारं पडली आहेत,' असं संदर्भ दानवेंनी दिले.
येत्या दोन महिन्यांत राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत येईल; दानवेंचा दावा
सध्या सरकारमधील तीन पक्षांमध्ये एकमेकांबद्दल नाराजी असल्याचा दावा केला. 'काँग्रेसला वाटतं या सरकारमध्ये आपल्याला कोणी विचारत नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचा, तर महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे. त्यामुळे काँग्रेस नाराज आहे. राष्ट्रवादीनं सगळी महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली आहेत. मुख्यमंत्रिपद असूनही शिवसेना अडचणीत आहे. कारण महत्त्वाची खाती त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे सरकारमध्ये त्यांचं काहीच चालत नाही,' असे दावे त्यांनी केले.
दोन महिन्यांत राज्यात सत्तांतर होईल. तशी जुळवाजुळव झालेली आहे, असं विधान दानवेंनी केलं. त्यामुळे भाजपनं नेमकी कोणती जुळवाजुळव केली आहे, असा प्रश्न अनेकांना पडला. त्याबद्दल विचारलं असता, आम्ही केलेली जुळवाजुळव अशी जाहीरपणे सांगू शकत नाही, असं दानवे म्हणाले. सरकार त्यांच्यातल्या मतभेदांमुळेच पडेल आणि त्यानंतर भाजप सक्षम सरकार देईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.