सदाभाऊ खोतांना पुन्हा सोबत घेणार?; 'ते' दोन निकष उपस्थित करत राजू शेट्टी म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Published: November 16, 2020 06:14 PM2020-11-16T18:14:54+5:302020-11-16T18:19:40+5:30

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींना दिला हात

not coming together raju shetty clears his stand about sadabhau khot | सदाभाऊ खोतांना पुन्हा सोबत घेणार?; 'ते' दोन निकष उपस्थित करत राजू शेट्टी म्हणाले...

सदाभाऊ खोतांना पुन्हा सोबत घेणार?; 'ते' दोन निकष उपस्थित करत राजू शेट्टी म्हणाले...

googlenewsNext

कोल्हापूर: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी झिडकारला आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं म्हणत खोत यांनी दिलजमाईचे संकेत दिले होते. मात्र खोत यांचे परतीचे दोर कापण्यात आल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं. ज्यांना संघटनेनं समिती नेमून हाकलून दिलं, त्यांचा परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचं राजू शेट्टी म्हणाले.

जिल्हाच्या राजकारणात भाजपकडून डावललं जात असल्यानं सध्या सदाभाऊ खोत नाराज असल्याची चर्चा आहे. आज त्यांनी राजू शेट्टींना हात देण्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र राजू शेट्टींनी खोतांना पुन्हा सोबत घेण्यास स्पष्ट नकार दिला. संघटनेत काम करण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष आहेत. स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य. या दोन्ही गोष्टी खोत यांच्याकडे नाहीत. त्यामुळे त्यांना संघटनेत पुन्हा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं शेट्टींनी म्हटलं.

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना हात?

आपल्या आणि राजू शेट्टींच्या मागण्या एकच असून शेतकऱ्यांचं हित हेच प्राधान्य असल्याचं खोत म्हणाले होते. मात्र खोत यांच्या विधानांचा शेट्टींनी समाचार घेतला. 'शेतकऱ्यांबद्दल अनेक जण पुतना मावशीचं प्रेम दाखवतात. पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्यांबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही. सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असेल, तर त्यांनी कडकनाथमध्ये अडकलेले शेतकऱ्यांचे पैसे परत करावेत. कदाचित त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल, म्हणून ते आता असं बोलत असावेत. मात्र त्यांच्या मायावी बोलण्याला आम्ही फसणार नाही,' अशी टीका राजू शेट्टींनी केली.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्यात काही वाद झाले. आमचं काही शेताच्या बांधावरचं भांडण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारणीत आम्ही शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा, अशी मागणी केली. स्वाभिमानीचीदेखील तीच मागणी आहे. चांगल्याला चांगली म्हणण्याची दानत आमच्यात आहे. आमचं आणि त्यांचं मत एकच आहे, असं सदाभाऊ म्हणाले. ते 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलत होते.

तुमची आणि राजू शेट्टींची मागणी आणि भूमिका एकच असली तर मग एकत्र येणार का, असा प्रश्न खोत यांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं अतिशय सूचक विधान त्यांनी केलं. काही मुद्द्यांवरून आमचे मतभेद झाले. पण आमची विचारधारा एकच आहे. राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेल्यानं आमच्यात दरी निर्माण झाली, असं खोत पुढे म्हणाले. 

सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून खोत यांनी रयत क्रांती संघटना उभारली. राजू शेट्टींचं राजकारण कमकुवत करण्यासाठी भाजपनं त्यांच्याशी जवळीक साधली. मात्र आता जिल्ह्यातल्या राजकारणात त्यांना डावललं जात असल्याचा आरोप त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे खोत भाजपवर नाराज असल्याचं समजतं. केंद्रानं आणलेल्या शेतकरी कायद्यांवरही खोतांनी टीका केली होती. 

Web Title: not coming together raju shetty clears his stand about sadabhau khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.