फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 06:00 IST2021-03-04T05:59:08+5:302021-03-04T06:00:04+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा

फडणवीस सरकारच्या काळातील 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात राबविलेल्या
३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी विधिमंडळ सदस्यांच्या समितीमार्फत करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी विधानसभेत केली. ही वृक्षलागवड फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून झाली आहे.
शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता. राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम राबविण्याकरिता
२०१६ ते २०२० या काळात वनविभागाला २ हजार ४२९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला, तो पूर्णपणे वापरण्यात आला आहे. वनविभागाकडून २८.२७ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२० अखेर त्यातील ७५.६३ टक्के झाडे जिवंत आहेत, असे वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.
समितीला चार महिन्यांची मुदत
n३१ मार्चपर्यंत समिती स्थापन होऊन त्यांना सुरुवातीला चार महिन्यांची मुदत देण्यात येईल.
nआवश्यकता वाटल्यास दोन महिन्यांची मुदतवाढ देऊन या प्रकरणी सहा महिन्यांत सभागृहाला अहवाल सादर केला जाईल, असे पवार यांनी सांगितले.
जवळपास २५ टक्के झाडे जगलेली नाहीत; नाना पटोले यांचा हल्लाबोल
nकाँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी, जवळपास २५ टक्के झाडे जगलेली नाहीत. अनेक ठिकाणी फक्त खड्डे खणले; पण लागवडच झाली नसल्याच्या बातम्या आल्या होत्या याकडे लक्ष वेधत विधिमंडळाच्या संयुक्ती समितीमार्फत या लागवडीची चौकशी करण्याची मागणी केली.
nही वृक्षलागवड हे ईश्वरीय कार्य आहे, ही वृक्षलागवड एक जनचळवळ बनली, असे सांगत तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोहिमेचे यश अधोरेखित केले. चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जयकुमार गोरे, प्रकाश साळुंके, धर्मरावबाबा आत्राम यांनी भाग घेतला.