Bihar Election 2020: बिहारमध्ये एकनाथ खडसेंचा मुद्दा गाजणार; विरोधक भाजपाला कोंडीत पकडणार

By प्रविण मरगळे | Published: October 23, 2020 07:14 AM2020-10-23T07:14:05+5:302020-10-23T07:17:50+5:30

Bihar Assembly Election 2020, Eknath Khadse NCP News: ४० वर्षापासून भाजपात असणारे एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Bihar Election 2020: Eknath Khadse issue to be raised in Bihar; Opposition will trap BJP over OBC | Bihar Election 2020: बिहारमध्ये एकनाथ खडसेंचा मुद्दा गाजणार; विरोधक भाजपाला कोंडीत पकडणार

Bihar Election 2020: बिहारमध्ये एकनाथ खडसेंचा मुद्दा गाजणार; विरोधक भाजपाला कोंडीत पकडणार

Next
ठळक मुद्देबिहार निवडणुकीत विरोधकांकडून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणारभाजपामध्ये मागासवर्गीयांचा सन्मान केला जात नाही तर जुन्या नेत्यांचा आदरही राखला जात नाहीएकनाथ खडसे ओबीसी समाजाचे असल्याने भाजपाने गेल्या ६ वर्षापासून त्यांचा छळ केला - विरोधक

पटणा – ४० वर्ष भाजपासोबत असलेले ओबीसी नेते म्हणून ओळख असणारे एकनाथ खडसेंनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली, खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, आगामी काळात एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राज्यातील राजकारणात किती परिणाम होतील ते पाहायला मिळेल, मात्र सध्या तरी बिहार विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या भाजपातून जाण्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.

बिहारमधील महायुती खडसे यांच्या जाण्याने भाजपाची ओबीसी विरोधी प्रतिमा म्हणून निर्माण करण्याची तयारी करत आहे. आरजेडीचे राज्यसभेचे खासदार मनोज झा यांनी सांगितले की, गेल्या ६ वर्षांपासून भाजपाकडून एकनाथ खडसेंचा छळ केला जात होता, कारण ते ओबीसी समाजातील आहेत. खडसे यांनी भाजपाचे बिहार निवडणूक प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. महत्त्वाचे म्हणजे खडसे हे केवळ ओबीसी नेते म्हणून ओळखले जात नव्हते तर ते महाजन-मुंडे गटाचे खंदे समर्थकही होते.  महाजन-मुंडे या जोडीने महाराष्ट्रात भाजपाला मोठी ताकद दिली होती असं ते म्हणाले.

एकनाथ खडसेंनी भाजपाला रामराम केल्यानंतर आता बिहारमध्ये विरोधी पक्ष हा मुद्दा जोरदार उचलून धरणार आहे.  भाजपामध्ये मागासवर्गीयांचा सन्मान केला जात नाही तर जुन्या नेत्यांचा आदरही राखला जात नाही असा प्रचार भाजपाच्या विरोधात केला जाणार आहे. ज्यांनी भाजपाला कष्ट करून मोठे केले आता पक्ष त्यांना बाजूला ठेवत आहे. या माध्यमातून बिहारमधील जुन्या नेत्यांच्या समर्थकांनाही जवळ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद यांचा समावेश आहे ज्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.

त्यामुळे बिहार निवडणुकीत विरोधकांकडून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महायुती निवडणूक सभा आणि जनसंपर्कातून भाजपाविरोधी प्रचार करणार आहे. एकनाथ खडसेंची सोडचिठ्ठी असो वा यशवंत सिन्हा, या सर्व गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवल्या जातील असं राजदच्या नेत्यांचे म्हणणे आहे. परंतु एकनाथ खडसे यांच्या जाण्याने बिहार निवडणुकीत मोठा फरक पडणार नाही आणि विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, म्हणून या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात आहे असा आरोप भाजपाने केला आहे.

एकनाथ खडसेंचा राजकीय प्रवास कसा होता?

१९८० मध्ये एकनाथ खडसे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपाचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते. एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, १९८७ मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. १९८९ मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (१९८९ – २०१९) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

१९९५ ते १९९९ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये खडसेंनी अर्थ आणि सिंचन या दोन मंत्रालयांची जबाबदारी स्वीकारली होती. खडसेंनी नोव्हेंबर २००९ ते ऑक्टोबर २०१४ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे. (Eknath Khadse Political Career)

२०१४ मध्ये एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी मानले जात होते. पण अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे महसूल मंत्रालयाची धुरा होती. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपातून ३ जून २०१६ रोजी एकनाथ खडसेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारलं होतं. त्यांच्याऐवजी कन्या रोहिणी खेवलकर-खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत लिंबा पाटील यांनी १९८७ मतांनी त्यांचा पराभव केला.

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी

एकनाथ खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे त्यांनी अनेकदा विधानसभेत सरकारला धारेवर धरले. आकडेवारी, पुराव्यांसह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत होते. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना एकनाथ खडसेंनी सलग साडे आठ तास भाषण करून विक्रम नोंदवला. याच भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकनाथ खडसेंचा विशेष सन्मान केला.

Web Title: Bihar Election 2020: Eknath Khadse issue to be raised in Bihar; Opposition will trap BJP over OBC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.