Bihar Election 2020 : "कोण कोणाला देशाबाहेर काढणार?, कोणामध्ये इतका दम नाही", नितीश कुमारांचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 12:59 PM2020-11-05T12:59:14+5:302020-11-05T13:09:53+5:30

Bihar Election 2020 And Nitish Kumar : नितीश कुमार यांनी एका सभेदरम्यान त्यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्यांना टोला लगावला आहे.

bihar assembly elections 2020 no one has power to exile our people cm nitish kumar | Bihar Election 2020 : "कोण कोणाला देशाबाहेर काढणार?, कोणामध्ये इतका दम नाही", नितीश कुमारांचा सणसणीत टोला

Bihar Election 2020 : "कोण कोणाला देशाबाहेर काढणार?, कोणामध्ये इतका दम नाही", नितीश कुमारांचा सणसणीत टोला

Next

नवी दिल्ली - बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. याच दरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत जोरदार निशाणा साधला जात आहे. नितीश कुमार यांनी एका सभेदरम्यान त्यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्यांना टोला लगावला आहे. "कोण कोणाला देशाबाहेर काढणार?, कोणामध्ये इतका दम नाही" असं म्हणत नितीश कुमारांचा सणसणीत टोला लगावला आहे. बिहारमधील एका सभेत जनतेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

नितीश कुमार यांची किशनगंजमध्ये एक सभा झाली. "हा चुकीचा प्रचार कोण करत आहे. उगाच बडबड करत असतात. कोण कोणाला देशाबाहेर काढणार? सर्व भारताचे नागरिक आहेत. कोणामध्ये दम नाही की आपल्या माणसांना देशाबाहेर काढू शकेल. कोण बाहेर काढणार आहे? हे असं कसं बोलत राहतात. जेव्हापासून जनतेने संधी दिली, तेव्हापासून समाजात प्रेम, बंधूभाव आणि सद्भावनापूर्ण वातावरण निर्माण केलं. सर्वांना एकजूट करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही काम करत राहतो. समाजात वाद चालूच राहावेत अशी काही लोकांची इच्छा आहे."

"आमचा उद्देश हाच आहे की, सर्वजण प्रेमाने राहावेत. तेव्हाच समाज पुढे जाईल, लोक प्रगती करतील" असं नितीश कुमार यांनी म्हटलं आहे. सीएएवरून त्यांनी निशाणा साधला आहे. टीका करताना त्यांनी कोणाचंच नाव घेतलं नाही. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभेत बांगलादेश व पाकिस्तानातून आलेल्या घुसखोरांना बाहेर काढू, असं विधान केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी असं म्हटल्याचं बोललं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाषणाला उभे राहताच त्यांच्यावर कांदा फेकण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली आहे. मधुबनीच्या हरखालीमध्ये नितीश कुमार एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नोकऱ्यांवर बोलायला सुरुवात केली. तेव्हाच समोरील गर्दीतून कोणीतरी त्यांच्यावर कांदा फेकला. यावर नितीश कुमार नाराज झाले आणि आणखी फेका, फेकत राहा, याचा कोणताही परिणाम होणार नाही, असं बोलायला लागले.

नितीश कुमारांवर भरसभेत कांदेफेक

सभेतील या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी जेव्हा कंदा फेकणाऱ्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा नितीश कुमार यांनीच त्यांना नको म्हणून सांगितलं. त्याला सोडून द्या, काही दिवसांनी स्वत:च त्यांना समजेल, असे ते म्हणाले. सुरक्षा पुरवल्यानंतर नितीश कुमारांनी त्यांचे भाषण पूर्ण केले. या प्रकरणावर बिहारचे मंत्री संजय कुमार झा यांनी विरोधकांना जबाबदार धरले आहे. विरोधकांना पटले आहे की, ते मतदानातून आम्हाला हरवू शकत नाहीत, यामुळे ते अशाप्रकारच्या घटना घडवत आहेत. विरोधक पुन्हा तोच काळ परत आणण्याच्या प्रयत्नात आहेत. हा हल्ला नितीश कुमारांवर झालेला जीवघेणा हल्ला आहे. ते तुम्हाला आवडो वा न आवडो मतांद्वारे सिद्ध होणार आहे. मात्र, हल्ला करून काय सांगू इच्छित आहात, हे बिहारची जनता पाहत आहे.

Web Title: bihar assembly elections 2020 no one has power to exile our people cm nitish kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.