Bihar Assembly Election Results: भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?

By कुणाल गवाणकर | Published: November 10, 2020 12:41 PM2020-11-10T12:41:48+5:302020-11-10T12:44:38+5:30

Bihar Assembly Election Results: भाजपच्या राजकारणामुळे जेडीयू अडचणीत; बिहारमध्ये भाजप ठरणार मोठा भाऊ

Bihar Assembly Election Results bjp winning more seats than jdu big blow for cm nitish kumar | Bihar Assembly Election Results: भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?

Bihar Assembly Election Results: भाजपच्या राजकारणानं मुख्यमंत्री नितीश कुमार घायाळ; मित्रपक्षावरच भाजपचा बाण?

Next

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होताना दिसत आहे. सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच सुसाट सुटलेल्या महागठबंधनची आता मात्र पिछेहाट होताना दिसत आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी राज्यात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महागठबंधनचं सरकार येईल, असे अंदाज वर्तवले होते. मात्र हे अंदाज आता चुकीचे ठरताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलानं (जेडीयू) मुसंडी मारली आहे. त्यामुळे सध्याचे आकडे पाहता बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचं सरकार येण्याची दाट शक्यता आहे.

बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, NDA बहुमताच्या पुढे

महाराष्ट्रात आधी भाजप युतीमध्ये लहान भाऊ होता. मात्र २०१४ नंतर भाजपनं शिवसेनेला मागे टाकत आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिलं. बिहारमध्येही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. २०१५ मध्ये ७१ जागा जिंकणाऱ्या जेडीयूची यंदा पिछेहाट झाली आहे. सध्याच्या घडीला जेडीयू ४६ जागांवर पुढे आहे. तर भाजपनं ७३ जागांवर मुसंडी मारली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला ५३ जागा जिंकता आल्या होत्या. मात्र यंदा थेट ७० च्या पुढे जात भाजप राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरताना दिसत आहे.

तेजस्वी पर्व! बिहारमध्ये "मंगलराज" सुरू होईल - संजय राऊत

भाजप, जेडीयू आणि लोकजनशक्ती पार्टी यांची बिहारमध्ये आघाडी होती. मात्र जागावाटपावरून लोजपानं राज्यात एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपण मुख्यमंत्री नितीश कुमार आणि त्यांच्या जेडीयूच्या विरोधात आहोत. पण भाजपच्या विरोधात नाही, असं स्पष्ट भूमिका लोजपचे प्रमुख चिराग पासवान यांनी घेतली. एनडीएच्या बाहेर पडल्यावर त्यांनी जेडीयूच्या विरोधात दंड थोपटले. जेडीयूचे उमेदवार असलेल्या सगळ्याच जागांवर त्यांनी उमेदवार दिले. त्याचा फटका जेडीयूला बसताना दिसत आहे.

जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार, प्रवक्ते के.त्यागी यांनी केले धक्कादायक विधान

सध्याच्या मतमोजणीचे कल पाहता भाजपानं जेडीयूला मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे लोजपनं जेडीयूच्या विरोधात भूमिका घेत असताना भाजपला आव्हान दिलं नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भाजपचा विजय सोपा झाला. तर लोजपच्या विरोधी भूमिकेचा फटका थेट जेडीयूला बसला. नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार, असं भाजप नेत्यांनी वारंवार सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील कुमारच मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट केलं. मात्र जेडीयूच्या जागा कमी झाल्यानं नव्या सरकारवर भाजपचं वर्चस्व असेल. त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची खाती असतील हे स्पष्ट आहे.

चिराग पासवान यांनी जेडीयूविरोधात शड्डू ठोकत भाजपसाठी सोयीस्कर ठरणारी भूमिका घेतली. आपण मोदींचे हनुमान अशी स्वत:ची ओळख ते सांगत होते. त्याचा फायदा पासवान यांना फारसा होताना दिसत नाही. मात्र जेडीयूचं नुकसान करण्यात त्यांना यश मिळाल्याचं दिसत आहे. मोदींनी प्रचारसभांमध्ये राजदचे नेते आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांचा उल्लेख 'जंगलराज के राजकुमार' असा केला. मोदींनी वापरलेल्या या विशेषणाचा फटका राजदला बसताना दिसत आहे.

Web Title: Bihar Assembly Election Results bjp winning more seats than jdu big blow for cm nitish kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.