Bihar Assembly Election 2020 : ‘मोदी से बैर नही, नितीश तेरी खैर नही’, बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट
By बाळकृष्ण परब | Updated: October 3, 2020 15:52 IST2020-10-03T15:43:06+5:302020-10-03T15:52:04+5:30
Bihar Assembly Election 2020 Marathi News : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमधील घटकपक्ष असलेल्या भाजपा, एलजेपी आणि जेडीयूमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तसेच गजर पडल्यास एलजेपी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Bihar Assembly Election 2020 : ‘मोदी से बैर नही, नितीश तेरी खैर नही’, बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकारण आता बऱ्यापैकी तापू लागले आहे. एकीकडे विरोधी आरजेडी- काँग्रेस आघाडीमधील जागावाटप बऱ्यापैकी निश्चित झाले असले तरी सत्ताधारी जेडीयू-भाजपा-एलजेपी यांच्यातील जागावाटपाबाबत अद्याप खेचाखेची सुरू आहे. जागावाटपाबाबत तिन्ही पक्षात एकमत होत नसल्याने चिराग पासवान यांनी वेट अँड वॉचचे धोरण स्वीकारले आहे. दरम्यान, बिहारमध्ये लागलेले सूचक पोस्टर राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.
'मोदी से बैर नही, नितीश तेरी खैर नही' अशा आशयाचे पोस्टर्स बिहारमध्ये लागले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून लोकजनशक्ती पार्टीने (एलजेपी) आपली नाराजी भाजपावर नाही तर जेडीयूवर आहे, असे संकेत पोस्टरच्या माध्यमातून दिले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी खुर्चीच प्राथमिकताआहे, तर भाजपा आणि लोकजनशक्ती पार्टीसाठी बिहार प्राथमिकता असल्याचे या पोस्टरच्या माध्यमातून दर्शवण्यात आले आहे.
२०१८ मध्ये झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीवेळी अशाच प्रकारचे पोस्टर्स राजस्थानमध्ये लागले होते. तेव्हा मोदी से बैर नही, वसुंधरा तेरी खैर नही, असे पोस्टर्स लागले होते. त्यानंतर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांचे सरकार जाऊन काँग्रेसचे सरकार आले होते.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमधील घटकपक्ष असलेल्या भाजपा, एलजेपी आणि जेडीयूमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तसेच गजर पडल्यास एलजेपी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. एलजेपीच्या संसदीय मंडळाची आज संध्याकाळी याबाबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे. एलजेपीचे प्रमुख रामविलास पासवान सध्या आजारी आहेत त्यामुळे जागावाटपाबाबतच्या सर्व चर्चांची जबाबदारी चिराग पासवान यांनी सांभाळलेली आहे.
दरम्यान, बिहारमध्ये एलजेपी एनडीएपासून वेगळी झाली तरी केंद्रात एलजेपीसोबतची आघाडी सुरू कायम राहील आणि रामविलास पासवान केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून कायम राहतील. तसेच बिहारमध्ये भाजपाविरोधात एलजेपी उमेदवार उभे करणार नाही. मात्री जेडीयूविरोधात प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे केले जातील, असे संकेत चिगार पासवान यांनी दिले आहेत.