दहा वर्षांमध्ये कॅबमध्ये झाली तिप्पट वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:29 IST2019-02-19T00:28:57+5:302019-02-19T00:29:20+5:30
आरटीओ नोंदणी : रिक्षामधून प्रवास करणाऱ्या नागरिकांची टॅक्सीलाच जादा पसंती

दहा वर्षांमध्ये कॅबमध्ये झाली तिप्पट वाढ
पुणे : कधीकाळी सायकलींचे शहर म्हणून ओळख असलेले पुणे शहर आता दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच राज्यात सर्वाधिक रिक्षाही पुण्यातच आहेत. पण बदलती जीवनशैली, उंचावलेले राहणीमान यांमुळे आता रिक्षामधून प्रवास करणारे अनेक नागरिक कॅबकडे वळू लागले आहेत. त्यामुळे मागील दहा वर्षांच्या तुलनेत टॅक्सी-कॅबची संख्या तब्बल तिपटीने वाढली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रवाशांचा भार वाहणाºया रिक्षाला कॅब टक्कर देत आहे.
वाढलेल्या शिक्षण, रोजगाराच्या संधी, लगतच्या परिसरात विस्तारलेले उद्योगधंदे अशा विविध कारणांमुळे पुणे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. सायकलींची जागा दुचाकी, चारचाकींनी घेतली. अनेक वर्षांपासून सार्वजनिक वाहतुक व्यवस्था म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळा (पुर्वीची पीएमटी) ला प्रवाशांकडून पसंती मिळू लागली. कालांतराने प्रवाशांचा ओढा रिक्षाकडे वाढत गेला. बससेवेच्या अनियमिततेमुळे रिक्षाची वाढ वेगाने होत गेली. आर्थिक वर्ष २००८-०९ मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सुमारे ६० हजार रिक्षांची नोंदणी झाली होती. त्यातुलनेत टॅक्सी किंवा कॅबची संख्या केवळ १० हजाराच्या घरात होती. मात्र, सध्या ही स्थिती बदलली आहे. चालु आर्थिक वर्षामध्ये ३१ जानेवारीपर्यंत कॅबची संख्या वाढली आहे.
मागील पाच वर्षांपुर्वी रिक्षाला परवाना देणे बंद केल्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या रोडावत गेली. त्यामुळे डिसेंबर २०१६ पर्यंत रिक्षांची संख्या ४५ हजारांपर्यंत खाली आली. हा परवाना पुन्हा जानेवारी २०१७ मध्ये खुला करण्यात आला. मात्र, या कालावधीमध्ये अनेक जण टॅक्सी-कॅबकडे वळावे. परिणामी कॅबची संख्या वाढत गेली. त्यातच तीन वर्षांपुर्वी शासनाने शहरात प्रवासी वाहतुकीला कॅबला मान्यता दिली. या निर्णयामुळे कॅबवर अक्षरश: उड्या पडल्या. २०१५-१६ पर्यंत सुमारे १० हजार कॅब होत्या. ही संख्या २०१६-१७ मध्ये तब्बल २२ हजारांच्या पुढे गेली. दि. जानेवारी २०१८ पर्यंत हा आकडा सुमारे ३४ हजारांवर पोहचला आहे. परवान्यावरील बंद उठल्यानंतर रिक्षाची संख्या वाढू लागली आहे.