‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 07:59 IST2026-04-13T07:59:13+5:302026-04-13T07:59:44+5:30
Pune Crime News: शास्त्रज्ञ असलेल्या प्राध्यापकाकडून सुरू असलेल्या अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक छळाला कंटाळून एका पीएच.डी विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. ११ एप्रिल) दुपारी एकच्या सुमारास शाहूनगर येथे घडली.

‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
पिंपरी - शास्त्रज्ञ असलेल्या प्राध्यापकाकडून सुरू असलेल्या अनैतिक प्रकार, गैरवर्तन आणि मानसिक छळाला कंटाळून एका पीएच.डी विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. ११ एप्रिल) दुपारी एकच्या सुमारास शाहूनगर येथे घडली. या प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामधील साहाय्यक संचालक डॉ.ए.बिन्नीयामीन (वय ५०, रा.धानोरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या ३० वर्षीय विद्यार्थिनीच्या वडिलांनी या प्रकरणी शनिवारी (दि. ११ एप्रिल) भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी बॉटनी विषयात ‘पीएच.डी’ करत होती. ‘पीएच.डी’साठी मार्गदर्शक असलेला प्राध्यापक डॉ.बिन्नीयामीन हा शास्त्रज्ञ आहे. विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ऑगस्ट २०२५ पासून प्राध्यापकाकडून गैरवर्तन आणि मानसिक छळ सुरू होता, असे नमूद करण्यात आले आहे. या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे तिने लिहिले आहे. विशेष म्हणजे, आत्महत्येच्या दोन दिवस आधी त्याने स्टॅम्प पेपरवर माफीपत्र दिले होते. पुन्हा असा प्रकार करणार नसल्याचे त्यात नमूद होते. मात्र, विद्यार्थिनी मानसिक धक्क्यातून सावरू शकली नाही. या प्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. अनैतिक प्रकार, गैरवर्तन व मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने घरात पंख्याला गळफास घेतल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. पोलिस निरीक्षक भोजराज मिसाळ तपास करत आहेत.
मित्राशी फोनवर बोलत असताना घेतला गळफास...
विद्यार्थिनीचे आईवडील गावी गेले होते. त्यावेळी तिने शनिवारी दुपारी तिच्या मित्राला फोन केला. मी आत्महत्या करत आहे, असे तिने सांगितले. त्यानंतर, मित्राने तिला बोलण्यात गुंतवून ठेवून तिच्या घराकडे निघाला.
मात्र, तो घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिने गळफास घेतला. रुग्णालयात दाखल केले असता, डाॅक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.