हिंजवडी : थेर गावातून खळखळून वाहणारी पवना नदी पुन्हा प्रदूषित झाली. नदी पात्रात रसायन मिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने संपूर्ण नदीपात्रच फेसाळले आहे. वारंवार येथील नदीपात्र फेसाळत असल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.प्रदूषित होणाऱ्या नदी पात्राबाबत ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. शुक्रवारी (दि. २१) केजुदेवी धरण परिसरात पवना नदी पात्र पूर्ण फेसाळले होते. नदीची झालेली दुरवस्था आणी पसरलेल्या दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागत असल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, मागील अनेक महिने केजुदेवी धरण परिसरात पवना नदीला रसायन मिश्रित सांडपाणी आणी जलपर्णीचा विळखा पडला होता. त्यामुळे, नदीची अक्षरशः गटारगंगा झाल्याने परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.सध्या पवना नदी जलपर्णी मुक्त झाली मात्र, धरण परिसरात वारंवार रसायनमिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने संपूर्ण नदीपात्र फेसाळत आहे. त्यामुळे, जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून, मानवी आरोग्यासह पर्यावरणाचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केजुदेवी धरण परिसरात पवना नदी वारंवार का प्रदूषित होत आहे? याची सखोल चौकशी करून, कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पवना नदी पुन्हा प्रदूषित; थेरगाव केजुदेवी बंधारा पुन्हा फेसाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 11:32 IST