पिंपरी : ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयाचे दुबईला गेलेले ८४ विद्यार्थी आणि चार प्राध्यापक संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) हवाई क्षेत्राच्या बंदीमुळे दुबईत अडकले होते. आखाती देशांमधील युद्धामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, मंगळवारी (दि. ३ मार्च) सायंकाळी साडेसातच्या सुमारास दुबई येथून विमानाने विद्यार्थी आणि शिक्षक मुंबईच्या दिशेने आकाशात झेपावले. ‘आमची लेकरं परत येताहेत’, असे म्हणत संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
पिंपरी-चिंचवड शहरातील ताथवडे येथील इंदिरा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेचे ८४ विद्यार्थी आणि प्राध्यापक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी दुबईला गेले होते. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे विमाने रद्द झाल्याने ते दुबईत अडकून पडले होते. त्यांच्या परतीसाठी अधिकारी आणि यंत्रणांशी विद्यापीठ प्रशासनाने संपर्क साधला. त्यानंतर त्यांचा दुबईतून प्रवास सुरू झाला.
महाविद्यालय प्रशासनाने सर्व पालकांना ताथवडे येथे उपस्थित राहण्याची सूचना दिली. मुंबई विमानतळावर रात्री साडेदहाच्या सुमारास विमान दाखल झाल्यानंतर तेथून विद्यार्थ्यांना ताथवडे येथे महाविद्यालयात आणले. त्यानंतर पालकांच्या स्वाधीन केले.
उड्डाणावेळचा व्हिडिओ केला शेअर
संयुक्त अरब अमिरातीच्या स्थानिक प्रशासनाशी भारतीय दूतावास, परराष्ट्र मंत्रालय, महाराष्ट्र शासन, पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासन आणि इंदिरा महाविद्यालय प्रशासन यांनी संपर्क आणि समन्वय ठेवला. दुबईत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ दिली नाही. त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रयत्न केले. सर्वांच्या प्रयत्नांमुळेच आम्ही मायदेशी परतत आहोत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्याबाबत त्यांनी व्हिडिओदेखील शेअर केला.
दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वच यंत्रणांनी सहकार्य केले. चार्टर्ड विमान उपलब्ध होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष सहकार्य झाले. विद्यार्थ्यांसोबत दुबईत अडकलेल्या इतर भारतीयांसाठीही सर्व यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.- चेतन वाकलकर, सल्लागार, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
Web Summary : 84 students and professors from Indira College, stranded in Dubai due to flight bans, safely returned to Mumbai. Parents expressed relief as authorities coordinated their return after war concerns.
Web Summary : इंदिरा कॉलेज के 84 छात्र और प्रोफेसर उड़ान प्रतिबंधों के कारण दुबई में फंसे हुए थे, सुरक्षित मुंबई लौट आए। युद्ध की चिंताओं के बाद अधिकारियों ने उनकी वापसी का समन्वय किया।