पिंपरी :मावळातील शेलारवाडी जवळील इंद्रायणीनदीवरील कुंडमाळा येथील साकव पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. नवीन पुलाला निधी आणि कार्यारंभ आदेश मिळूनही काम सुरू का झाले नाही, याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप लोकांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
मावळातील इंद्रायणी नदीवर शेलारवाडीकडून इंदोरीकडे जाण्यासाठी साकव पूल उभारण्यात आलेला आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने १९९३ मध्ये उभारण्यात आला होता. तात्कालिन खासदार अण्णा जोशी यांच्या निधीतून सुमारे दहा लाख रुपये खर्चून पुलाचा काही भाग बांधण्यात आला होता. उर्वरित फुलाचे बांधकाम तत्कालीन आमदार दिवंगत आमदार दिगंबर भेगडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या माध्यमातून तो बांधण्यात आला. यासाठी पुन्हा सुमारे दहा लाख रुपये खर्च करण्यात आला होता.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कुंडमळा साकव पुलापासून जवळच नवीन पुलाची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार हा पूल १७० मीटर लांबीचा असून तो ७. ५ मीटर रुंदीचा आहे. त्यासाठी आठ कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. या संदर्भातील निविदा प्रक्रिया होऊन दहा जूनला कार्यारंभ आदेश देण्यात आला होता, त्यासाठी बारा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्याप काम सुरू झाले नाही. साकव पुल कोसळल्याने या भागातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.