Maharashtra Elecion 2019 : शरद पवारांची अवस्था ‘शोले’तील जेलर सारखी : मुख्यमंत्र्यांकडून बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 14:29 IST2019-10-11T14:26:19+5:302019-10-11T14:29:49+5:30
काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेले आहेत आणि इकडे शरद पवार यांची अवस्था ‘शोले’ सिनेमातील ‘जेलर’ सारखी झाली आहे. ‘

Maharashtra Elecion 2019 : शरद पवारांची अवस्था ‘शोले’तील जेलर सारखी : मुख्यमंत्र्यांकडून बोचरी टीका
पिंपरी : विधानसभा निवडणूक कोणाविरोधात लढायची हेच कळत नाही. आमचे पहिलवान निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, पण पुढे कोणीच नाही. काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेले आहेत आणि इकडे शरद पवार यांची अवस्था ‘शोले’ सिनेमातील ‘जेलर’ सारखी झाली आहे. ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे साथ आओ’ प्रत्यक्षात मात्र त्यांच्यामागे कोणीच नाही, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली.
पिंपरी-चिंचवड येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा रहाटणी येथे गुरुवारी झाली. या वेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव, अमित गोरखे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व गौतम चाबुकस्वार आदी उपस्थित होते. ‘‘सुशीलकुमार शिंदे हे द्रष्टे नेते आहेत. त्यांना निवडणुकीनंतर काय होणार हे कळले आहे. म्हणूनच त्यांनी सोलापूरमध्ये आम्ही थकलो आहे. आमच्याने काही होणार नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी विलीनीकरणाची भाषा त्यांनी केली. काँग्रेस आघाडीची अवस्था अशी बिकट झाली आहे की, त्यांना विरोधी पक्षनेताही निवडता येणार नाही. त्यासाठी लागणाऱ्या १० टक्के जागाही निवडून येणार नसल्याची खात्री सुशीलकुमार शिंदे यांना पटल्यानेच त्यांनी विलीनीकरणाची भाषा सुरू केली आहे, असा टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मारला.
......
बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाचे वाजले बारा
४चिंचवड व भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीला घड्याळावर निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाचे बारा वाजले आहेत. आमचे दोन पहिलवान रिंगणात उतरले आहेत. मात्र, समोर कोणताच उमेदवार दिसत नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून द्या, नाहीतर हिशेब द्यावा लागेल
मी उमेदवार निवडून द्या, असे सांगायला आलो नाही. उमेदवार निवडून येणारच आहेत. तुम्हाला विचारायला आलोय की, रॅकॉर्ड ब्रेक मताने निवडून द्या, नाहीतर तुम्हाला हिशेब द्यावा लागेल, असा इशारा मतदारांना देत, मला माहिती आहे, तुम्ही महायुतीचे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून द्याल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेळाव्यात व्यक्त केला.