आयटीयन्सची वाट अद्यापही बिकटच, वाहतुकीचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2018 00:38 IST2018-11-17T00:37:01+5:302018-11-17T00:38:06+5:30
वाहतुकीचा खोळंबा : वाकड येथील भुयारी मार्गात मैैलामिश्रित पाणी साचल्याने वाहनचालकांना करावी लागतेय कसरत

आयटीयन्सची वाट अद्यापही बिकटच, वाहतुकीचा खोळंबा
वाकड : जगाच्या नकाशावर झळकलेल्या आयटी पार्क हिंजवडीची वाहतूक समस्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर आणि हिंजवडी वाहतूक पोलिसांच्या पुढाकाराने सुटल्याचे चित्र असतानाच महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे येथील बहुतेक चौकात भर हिवाळा आणि उन्हाळ्यात पूर येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सुरळीत झालेल्या वाहतुकीला ड्रेनेजच्या पाण्याने अडथळा होत आहे. परिणामी अद्यापही आयटीयन्सची वाट बिकटच असल्याचे वास्तव आहे.
वाकड, भूमकर वस्ती भुयारी पुलाखाली, तसेच हिंजवडीतील शिवाजी चौकात महिन्यातून दोन-तीन वेळा किंवा अधूनमधून कधीही मैलामिश्रित पाणी वाहिनी तुंबून चेंबर ओसंडून वाहतात. मैलामिश्रित पाणी चेंबरमधून रस्त्यावर येते. रस्त्याच्या सखल भागात मैलामिश्रित पाणी साचते. या साचलेल्या पाण्यातूनच वाहनचालकांना वाहन चालविण्याची कसरत करावी लागते. येथील भुयारी मार्गात गेल्या अनेक वर्षांपासून घरगुती व हॉटेल व्यावसायिकांचे सांडपाणी व मैलामिश्रित पाणी साचत असल्याने येथे वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे. ऐन कंपनीत जाण्याच्या वेळेला हे पाणी अधिक प्रमाणात रस्त्यावर साचत असल्याने तब्बल अर्धा-एक तास वाहतूक संथ होते. वाहनांचा खोळंबा झाल्याने वाहतूक कोंडी होते. या दुर्गंधीतून वाट काढत आयटी अभियंते व कामगारांना जावे लागते. याशिवाय होणाऱ्या वाहतूककोंडीचा करावा लागणारा सामना वेगळाच. या नित्याच्या गैरसोईला वाहनचालक कंटाळले आहेत.
या समस्येमुळे वाहतूक पोलीसही हतबल झाले आहेत. आयटी पंढरी समजल्या जाणाऱ्या हिंजवडीनगरीच्या वाहतूक समस्येची आणि या वाहतूककोंडीत वर्षानुवर्षे अडकून-घुसमटून तासन्तास ताटकळत प्रवास करणाºया आयटी अभियंत्यांची सतत चर्चा होत असते. या वाहतूक समस्येला कंटाळून तब्बल १०६ आयटी कंपन्या स्थलांतराच्या वाटेवर आहेत. पंचवीसहूनअधिक कंपन्या स्थलांतरित झाल्याची अफवा पसरल्याने एकच खळबळ उडाली. या अफवेनंतर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी स्वत: हिंजवडीतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी लक्ष घातले.आयुक्तांच्या सूचनेनुसार हिंजवडीतील अनेक रस्ते एकेरी करण्यात आले. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तसेच काही वेळा त्यांच्या विरोधात जाऊन प्रायोगिक तत्त्वावर वाहतुकीत बदल करण्यात आले. हा बदल पचनी पडण्यासाठी वाहतूक पोलीस व स्थानिक ग्रामस्थांना देखील प्रचंड मनस्ताप झाला. आजही काही प्रमाणात हा त्रास सुरूच आहे. सर्वांनी हा त्रास सहन करीत सहकार्य केल्यामुळे आयटीनगरीतील वाहतूक समस्येचे ग्रहण सुटल्याचे चित्र आहे. असे असतानाच केवळ महापालिकेच्या गलथान कारभारामुळे वाहतूक कोंडीची समस्या पुन्हा डोके वर काढत आहे.
दुर्लक्ष : समस्येने काढले पुन्हा डोके वर
सांडपाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने येथे उपाययोजना केलेली नाही. परिणामी भर रस्त्यात सांडपाणी साचत आहे. वाहतूक समस्या सोडविण्यास पोलिसांना काही प्रमाणात यश आले होते. मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या पुन्हा डोके वर काढत आहे. पुन्हा वाहतूककोंडी होत आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाºयांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी आयटियन्सची कसरत होत आहे. त्यांचा वेळ वाया जात आहे. तसेच वाहतूक कोंडीमुळे येथे प्रदूषणाचाही प्रश्न उपस्थित होत आहे. मैलामिश्रित सांडपाण्याच्या समस्येबाबत महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करण्यात आला. असे असतानाही महापालिकेच्या संबंधित विभागाकडून त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
मैलापाण्याची ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही उपयोग शून्य होतो. तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. पुन्हा काही दिवसांतच तोच अनुभव येतो. हिंजवडी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनानेही सर्वतोपरी सहकार्य करून मैलापाण्याची समस्या त्वरित सोडवावी.
- किशोर म्हसवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग, हिंजवडी
दोन महिन्यांपूर्वी येथील काळाखडक झोपडपट्टीची गटार भूमिगत केली आहे. त्यामुळे येथील सांडपाणी साचण्याची समस्या सुटली आहे. मात्र वाकड सेंटर सोसायटीसमोरील गोल चेंबर तुंबत असल्याने त्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. सखल भागात ते साचत आहे.
- योगेश फल्ले, आरोग्य निरीक्षक