नीरज चोप्राचा भाला, सिंधूचे रॅकेट अन् लवलिनाचे ग्लोव्ह्ज यांचा लिलाव होणार, पंतप्रधान मोदींचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 10:47 AM2021-08-21T10:47:24+5:302021-08-21T11:11:06+5:30

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी सात पदकं जिंकली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी सात पदकं जिंकली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती.

नीरज चोप्रानं ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, वेटलिफ्टर मीराबाई चानू व कुस्तीपटू रवी कुमार दहिया यांनी रौप्यपदक, पी व्ही सिंधू, लवलिना यांच्यासह कुस्तीपटू बजरंग पुनिया व पुरुष हॉकी संघानं कांस्यपदकाची कमाई केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतील टोक्यो ऑलिम्पिक पदकविजेत्या अन् सहभागी झालेल्या खेळाडूंची भेट घेतली. या खेळाडूंसोबत मोदींनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याला 'चुरमा' खायला दिला, कांस्यपदक विजेत्या पी व्ही सिंधूला Ice Creamचे दिलेले वचन पूर्ण केले.

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात ते टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंसोबत गप्पा मारत आहेत. मोदींनी या सर्व खेळाडूंना ब्रेकफास्टसाठी निमंत्रण दिले होते आणि सर्वांचा सत्कारही केला.

मोदींनी भालाफेकपटू नीरज चोप्रा, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि बॉक्सर लवलिना बोरगोईन यांना त्यांच्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील भाला, रॅकेट व ग्लोव्ह्ज यांचा सामाजिक कार्यासाठी लिलाव करण्याचा सल्ला दिला. या खेळाडूंनाही पंतप्रधान मोदींची ही कल्पना आवडली अन् त्यांनीही होकार दिला.

मोदींनी यावेळी नीरज चोप्राला विचारले,''तू भाल्यावर स्वाक्षरी कर. मी त्याचा लिलाव करेन, काही समस्या नाही?'' नीरजनंही चेहऱ्यावर गोड हसू आणत टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत वापरलेला भाला मोदींना दिला.

पी व्ही सिंधूनेही तिचं रॅकेट व लवलिनानं तिचे बॉक्सिंग ग्लोव्ह्ज पंतप्रधानांना सामाजिक कार्यात निधी गोळा करण्यासाठी दिले. जेव्हा लवलिनानं तिचे ग्लोज दिले तेव्हा मोदी चेष्ठेने म्हणाले,'' मी हे ग्लोव्ह्ज घातले, तर राजकिय मंडळी म्हणतील मोदी आमच्यासोबत भांडायला तयार आहेत.''

या वस्तूंचा लिलाव करून उभा राहणारा निधी समाजकार्यासाठी वापरण्यात येणार आहेत. पण, अद्याप याबाबत संपूर्ण माहिती हाती आलेली नाही.