असं होतं नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं वैयक्तिक जीवन, हे आहेत अद्याप समोर न आलेले पैलू

By बाळकृष्ण परब | Published: January 23, 2021 07:44 PM2021-01-23T19:44:52+5:302021-01-23T19:50:40+5:30

Netaji Subhashchandra Bose : आज आपण जाणून घेऊयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील अद्याप समोर न आलेले पैलू आणि स्वभाववैशिष्ट्यांविषयी.

आझाद हिंद सेनेचे प्रमुख, प्रखर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. आज आपण जाणून घेऊयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातील अद्याप समोर न आलेले पैलू आणि स्वभाववैशिष्ट्यांविषयी.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाची एक बाजू ही राजकारण आणि स्वातंत्र्य लढा ही होती. तर दुसरी बाजू ही आध्यात्मिकता होती. ते नियमितपणे योगसाधना करत असत. दिवसभर लोकांच्या गराड्यात असल्याने रात्रीच्या वेळी एकांत मिळाल्यावर ते ध्यानसाधनेत लीन होत असत.

सुभाषचंद्र बोस नेहमी आपल्यासोबत ज्या गोष्टी ठेवत त्यामध्ये भगवत गीतेचा समावेश होता. ते रोज गीतेचे वाचन करत असत. त्यामधून त्यांना शांती आणि शक्ती मिळे.

रात्रीच्या वेळी बहुतांश वेळ ते मौन राहणे पसंत करत. मात्र दिवसभर कामाचा व्याप असल्याने त्यांना दिनचर्या थांबवायला बऱ्याचदा उशीर होत असे. रात्री झोपताना ते दिवसभरातील आपल्या कार्याचे ते आध्यात्मिक परीक्षण करत असत.

आझाद हिंद सेनेच्या स्थापनेवेळी नेताजी हे स्वत: सैनिकांसोबत बसून त्यांच्याप्रमाणेच भोजन करत असत. जर कुणी खास व्यक्ती आली तरच त्याच्यासोबत वेगळं भोजन करत.

नेताजी हे चहा आणि कॉफीचे शौकीन होते. कोलकाता येथील घरात असताना दिवसाला ते २० ते २५ कप चहा पित असत. त्यांच्या सोबत राहिलेले लोक सांगतात की, ते क्वचितच संतापत असत. साधारणपणे ते शांतच राहत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वाचनाची खूप आवड होती. तुरुंगात राहत असताना ते वेगवेगळी पुस्तके वाचत असत. ते विविध विषयांवरच्या पुस्तकांचे वाचन करत असत. जगभरात काय चाललं आहे हे जाणून घेण्यात त्यांना रस असे. ते जेवढं वाचन करत. तेवढंच लिखाणही करत. त्यांचे लेख देश-विदेशातील अनेक वृत्तपत्रात प्रकाशित होत.

सुभाषचंद्र बोस हे कालीमातेचे भक्त होते. ते तंत्रसाधनेची शक्ती मानत असत. लियोनार्ड गार्डन आपल्या पुस्तकात लिहितात की, सुभाषबाबूंनी धर्मावर कधीही कुठले वक्तव्य केले नाही. मात्र हिंदू धर्म त्यांच्यासाठी भारतीयत्वाचा भाग होता. सुभाषबाबूंची आई कालीमातेची भक्त होती. त्यामुळे त्याचा प्रभाव सुभाषबाबूंवरही पडला.