उद्धव ठाकरेंना फोन करून राजनाथ सिंह म्हणाले, 'अस्सलाम वालेकुम'? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 09:40 AM2022-07-13T09:40:37+5:302022-07-13T09:43:00+5:30

राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारण जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्यात सत्तांतर घडल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही. आता राष्ट्रपती निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नवीन कॅबिनेट स्थापन होईल.

या घडामोडीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. त्यावेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याचा किस्सा सांगितला. या चर्चेतील एका विधानावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अलीकडेच खासदारांची बैठक बोलावली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवसेना आमदारांची बैठक झाली. यात उद्धव ठाकरेंनी सांगितले की, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन करून 'अस्सलाम वालेकुम' असं म्हटलं.

राजनाथ सिंह यांच्या या शब्दावर उद्धव ठाकरे संतापले तेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जय श्री राम म्हणत पुढे चर्चा सुरू ठेवली. उद्धव ठाकरे आणि राजनाथ सिंह यांच्या फोनवरील संवादाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

एनडीएकडून राजनाथ सिंह यांना राष्ट्रपती निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्याकडून देशभरातील प्रमुख पक्षांच्या राजकीय नेत्यांशी फोनवरून चर्चा करून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी विनंती करत आहेत.

यावेळी राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, राजनाथ सिंह यांना मेहबुबा मुफ्ती यांना फोन लावायचा असेल परंतु चुकीने मातोश्री येथे फोन लागला असावा असा टोला राऊतांनी लगावला.

तर दुसरीकडे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अशाप्रकारे संवाद झाल्याचा नकार दिला आहे. मुनगंटीवार म्हणाले की, या प्रकरणी मी राजनाथ सिंह यांना विचारलं असता असं काही झाले नाही. हे खोटं आहे असं सांगितले.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी खोटी विधानं करणं बंद करायला हवं असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. त्याचसोबत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मित्रपक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून आभार मानले आहेत.

१८ जुलै रोजी देशात राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २१ जुलैला निकाल येईल. संविधान नियमानुसार, देशात विद्यमान राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्याआधीच पुढील राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. आकडेवारीचं गणित लावलं तर भाजपा लोकसभा आणि राज्यसभेत मजबूत स्थितीत आहे. त्याशिवाय अनेक राज्यात भाजपाचं सरकार आहे.