१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?

By बाळकृष्ण परब | Updated: April 25, 2025 15:34 IST2025-04-25T15:08:14+5:302025-04-25T15:34:59+5:30

1971 India Pakistan War: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानवर लष्करी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. सोबतच पाकिस्तानच्या ताब्यात असलेला या पाकव्याप्त काश्मीरचा भागही परत मिळवावा अशी मागणी केली जात आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, सरकारने या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानवर लष्करी कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. सोबतच पाकिस्तानच्या ताब्यात असलेला या पाकव्याप्त काश्मीरचा भागही परत मिळवावा अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात काही कठोर पावलं उचलत सिंधू पाणीवाटप करार स्थगित केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने १९७१ युद्धानंतर दोन्ही देशात झालेला सिमला करार रद्द केला आहे. मात्र या करारानुसारच युद्धानंतर भारताने कब्जा केलेला बराचसा भाग पाकिस्तानला परत केला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने १९७१ च्या युद्धात पश्चिम पाकिस्तानमधील कोणकोणते भाग ताब्यात घेतले होते याचा हा एक आढावा.

१९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी भारताने पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करत बांगलादेश या नव्या राष्ट्राला जन्मास घातले होते हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र याच युद्धावेळी भारतीय लष्कराने आजच्या पाकिस्तानमधील बराचसा भूभाग आपल्या कब्ज्यामध्ये घेतला होता याची कल्पना अनेकांना नाही. त्यावेळी युद्धानंतर भार करतारपूर साहिबसह पीओकेचा काही भागही सहजपणे आपल्या ताब्यात ठेवू शकला असता. मात्र भारताने मनाचा मोठेपणा दाखवत हा भाग पाकिस्तानला परत केला होता.

१९७१ च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात दोन आघाड्यांवरून जोरदार हल्लाबोल केला होता. त्यात एक आघाडी पश्चिम पाकिस्तानमध्ये तर दुसरी आघाडी पूर्व पाकिस्तानमध्ये उघडण्यात आली होती. तसेच पूर्व पाकिस्तानचा तुकडा पाडून बांगलादेश या नव्या राष्ट्राची निर्मिती केली होती.

१९७१ च्या या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील सुमारे १५ हजार १० चौरस किमी एवढ्या भूभागावर कब्जा केला होता. तसेच ९० हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी बनवले होतेय तेव्हाची युद्धानंतरची परिस्थिती पाहता भारत पाकिस्तानी सैनिकांच्या बदल्यात पाकिस्तानचा ताब्यात घेतलेला भूभाग आपल्या ताब्यात ठेवू शकला असता.

दरम्यान, १९७१ च्या युद्धातील पराभवानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो हे करार करण्यासाठी सिमला येथे आले होते. त्या करारानुसार भारताने पाकिस्तानच्या सर्व युद्धकैद्यांची सुटका केली. तसेच भारतीय लष्कराने युद्धात जिंकलेला सर्व भूभागही पाकिस्तानला परत केला.

१९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा जो भूभाग जिंकला होता त्यामध्ये पंजाब प्रांतातील शकरगड तालुका, राजस्थानच्या सीमेजवळचे काही महत्त्वपूर्ण भूभाग आणि बाल्टिस्थानमधील तीन गावांचा समावेश होता.