India China FaceOff: पाकची खुमखुमी मिटणार नाही; चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताविरुद्ध षडयंत्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 03:43 PM2020-06-24T15:43:21+5:302020-06-24T15:47:54+5:30

लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढला आहे, भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले, तर चीनच्या सैनिकांचीही मोठी हानी झाली आहे.

एकीकडे भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढलेला असताना दुसरीकडे पाकिस्तान भारताविरोधात नवीन षडयंत्र तर रचत नाही ना, अशी शंका पाकिस्तानकडून सुरु असणाऱ्या हालचालींकडे बघून निर्माण होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्ताने लाइन ऑफ कंट्रोल(एलओसी)वर सैन्यबळ वाढवलं आहे. रावलपिंडी, लाहोर, फैसलाबाद, एबटाबाद आणि मुल्तानमध्ये तैनात अनेक बटालियनला एलओसीवर आणलं आहे. चीनसोबत सुरु असलेल्या संघर्षात पाकिस्तानने एलओसीवर सैन्यांची संख्या वाढवणं चांगले संकेत नाहीत.

पाकिस्तानने ७ जूननंतर रिफोर्समेंटसाठी त्यांच्या अतिरिक्त १५ बटालियन पुंछ आणि कुपवाडा याठिकाणी सीमेवर तैनात केल्या आहेत. पाकिस्तानच्या २८ पीआर(पाकिस्तान रायफल रेजीमेंट)ला पाकव्याप्त काश्मीरच्या सैन्यासोबत जोडलं आहे. या व्यतिरिक्त, ९ आझाद काश्मीर रेजिमेंटला रावलकोटमधील दुसर्‍या ब्रिगेडला जोडले गेले आहे.

अहवालानुसार एलओसीवर रावलपिंडीहून एसएसजीच्या दोन विशेष कंपन्या आणल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये सर्व सैनिकांची स्नायपिंग करण्यात माहीर आहेत. या बटालियनचे सैनिक पाकिस्तानातून एलओसीवरील पीओकेमध्ये सुमारे ६० फॉरवर्ड ठिकाणी पाठवले गेले आहेत. तसेच दोन एसएसजी कंपन्याही त्यांच्याशी संलग्न झाल्या आहेत.

हेच कारण आहे की, पाकिस्तानकडून मागील काही काळात सतत शस्त्रसंघीचं उल्लंघन केलं जात आहे. जेणेकरून दहशतवाद्यांना त्यांच्या मदतीने भारतात घुसखोरी करता येईल. मात्र गेल्या एका महिन्यात भारताने सुमारे २३ पाकिस्तानी सैनिक ठार मारले. तर ६० जण जखमी झाले आहेत.

पाकिस्तानी लष्कराने पीओकेमध्ये आरोग्यमंत्र्यांकडून आदेश जारी करून सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सैनिकांसाठी रक्त आणि बेड राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गलवान खोऱ्यात चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला, यात देशाचे २० जवान शहीद झाले त्यानंतर संपूर्ण देशभरात चीनबद्दल संताप व्यक्त करण्यात आला,

चीनच्या बळावर नेपाळ सरकारही भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे, भारताच्या तीन भागांचा समावेश करुन नेपाळने नवीन नकाशा जारी केला आहे, इतकचं नाही तर या नवीन नकाशाला नेपाळच्या संसदेत मंजुरीही देण्यात आली आहे.

चीन, नेपाळ आणि पाकिस्तान हे तीन देश मिळून सध्या भारताविरोधात भूमिका घेत आहेत, अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची एक इंच जमिनही कोणाला देणार नाही, सीमेच्या रक्षणासाठी लष्कारला फ्रि हँड दिला आहे असंही पंतप्रधानांनी सांगितले आहे.

Read in English