पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 09:35 PM2020-09-04T21:35:48+5:302020-09-05T08:14:49+5:30

india china faceoff : , २९ आणि ३० ऑगस्ट रोजी पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ असलेल्या मोक्याच्या ठिकाणी झालेल्या झटापटीत भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने चिनी सैन्याला सळो की पळो करून सोडले.

भारत आणि चीनमध्ये लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाने आता अधिकच गंभीर रूप धारण केले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती आहेत.

दरम्यान, गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या तणावादरम्यान, २९ आणि ३० ऑगस्ट रोजी पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळ असलेल्या मोक्याच्या ठिकाणी झालेल्या झटापटीत भारताच्या स्पेशल फ्रंटियर फोर्सने चिनी सैन्याला सळो की पळो करून सोडले. तसेच येथील ब्लॅक टॉपसह काही मोक्याच्या टेकड्यांवर वर्चस्व मिळवले. त्यामुळे पँगाँगमधील फिंगर ४ ते फिंगर ८ पर्यंतच्या भागातील चीनच्या हालचालींवर नजर ठेवता येणार आहे.

या घटनेनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वर्चस्वाच्या रणनीतीमध्ये भारताला आघाडी मिळाली आहे. आता भारताने या भागातून माघार घ्यावी, अशी मागणी चीन करत आहे. दरम्यान, चीनला सळो की पळो करून सोडणारी स्पेशल फ्रंटियर फोर्स हीा भारताची खास तुकडी आहे. जाणून घेऊयात तिच्या वैशिष्ट्यांविषयी.

१९६२ मध्ये झालेल्या चीनच्या युद्धानंतर स्पेशल फ्रंटियर फोर्सची स्थापना करण्यात आली होती. ही फोर्स भारतीय लष्कराचा भागा नाही तर ती रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (रॉ) या भारतीय गुप्तहेर संघटनेचा भाग आहे.

स्पेशल फ्रंटियर फोर्समधील जवान पर्वतीय, दुर्गम भागात उंचावर लढण्यास सक्षम असतात. त्यांच्या मोहिमा आणि कामकाज इतके गोपनीय असते की कधीकधी लष्करालासुद्धा त्यांच्या हालचालींबाबत माहिती नसते.

स्पेशल फ्रंटियर फोर्स ही डायरेक्टर जनरल ऑफ सिक्युरिटीच्या माध्यमातून थेट पंतप्रधानाना रिपोर्टिंग करतात. त्यामुळे यांच्या शौर्याच्या कहाण्या सर्वसामान्यांपर्यंत फारशा पोहोचत नाहीत.

आयबीचे संस्थापक संचालक भोलानाथ मलिक आणि दुसऱ्या महायुद्धात लढलेले आणि नंतर ओदिशाचे मुख्यमंत्री बनलेले बीजू पटनाईक यांच्या सल्ल्यानुसार भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिबेटी लढवय्यांच्या मदतीने एक अशी तुकडी स्थापन केली जी हिमालयीन पर्वतीय क्षेत्रात चिनी सैन्याचा सामना करू शकेल. तीच तुकडी स्पेशल फ्रंटियर फोर्स या नावाने ओळखली जाते.

थेट पंतप्रधानांच्या देखरेखीत तयार झालेल्या आणि आयबीचा भाग असलेली स्पेशल फ्रंटियर फोर्स आता रॉच्या अधिन आहे. तिचे मुख्यालय उत्तराखंडामधील चकारात येथे आहे.

सुरुवातीच्या काळाता अमेरिकी आणि भारताच्या आयबीच्या प्रशिक्षकांनी या फोर्सला प्रशिक्षण दिले. भारताने स्पेशल फ्रंटियर फोर्सचा वापर बांगलादेश युद्ध, कारगिल युद्ध, ऑपरेशन ब्लू स्टार आणि अन्य लष्करी कारवायांमध्ये केला होता.

स्पेशल फ्रंटियर फोर्समध्ये सेवेत असलेले जवान हे १९५० च्या दशकात तिबेटमध्ये चीनविरोधात पेटून उठलेल्या खंपा विद्रोह्यांचे उत्तराधिकारी आहेत, अशे अनेक लोकांचे मत आहे.

चीनने तिबेटवर आक्रमण केल्यानंतर तेथील नेते दलाई लामा हे १९५९ मध्ये भारतात आले होते. तसेच त्यानंतर तिवेटमधील रहिवासी निर्वासित होऊन भारतात दाखल झाले होते. ते आता भारताच्या पूर्वोत्तर भागासह दिल्ली, हिमाचल आणि अन्य ठिकाणी वसले आहेत.