31 मार्चपूर्वी देशातील निम्मी एटीएम बंद पडणार? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 09:35 PM2019-03-25T21:35:33+5:302019-03-25T21:42:07+5:30

भारतातील बदललेल्या नियमांमुळे मार्चअखेरीस देशातील निम्मी एटीएम मशीन बंद कराव्या लागणार असल्याचा इशारा सीएटीएमआय संघटनेने दिला आहे. जाणून घ्या याचे कारण.

देशात सध्या 2.38 लाख एटीएम आहेत. यापैकी 1.13 लाख मशिन बंद होण्याची शक्यता सीएटीएमआय संघटनेचे संचालक व्ही बालासुब्रमण्यन यांनी सांगितले. असे झाल्यास या उद्योगाशी संबंधित हजारो लोकांवर बेरोजगारीची समस्या उद्भवणार आहे. यामुळे सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या प्रयत्नांनाही खीळ बसणार आहे.

बंद होणाऱ्या मशिनमध्ये एक लाख ऑफ साईट एटीएम आणि 15 हजार व्हाईट लेबल एटीएमचा समावेश आहे. ही एटीएम बंद झाल्यास ग्रामीण आणि शहरी नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.

ऑफ साइट एटीएम म्हणजे जे एटीएम रहिवासी भाग आणि बाजारांमध्ये बसविलेली असतात. या एटीएमसोबत बँकेची ब्रांच नसते. तर व्हाईट लेबल म्हणजे नॉन बँकिंग कंपन्यांकडून बसविण्यात आलेली एटीएम होय.

बालासुब्रमण्यन यांनी सांगितले की, या बंदीचा परिणाम नोटाबंदी सारखा असणार आहे. कारण सबसिडीसह अन्या कारणासाठी पैसे हे एटीएमद्वारे काढण्यात येतात. ग्रामीण भागात अद्याप रोख रक्कमेवरच व्यवहार चालतात. यामुळे पैसे काढण्यासाठी लाभार्थी एटीएमचा वापर करतात. यामुळे सुरु असणाऱ्या एटीएमवर नोटाबंदीसारखीच रांग लागण्याची शक्यता आहे.

आरबीआयने एटीएमसंबंधीत नियमांमध्ये बदल केले आहेत. यानिसार रोख व्यवस्थापनाची व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि मशिनमध्ये रोख रक्कम ठेवण्याची कॅसेट बदलण्यासाठी सीएटीएमआयला जबरदस्तीने एटीएमच्या सॉफ्टवेअरमध्ये आणि हार्डवेअरमध्ये बदल करावे लागत आहेत. यासाठी 3500 कोटींचा अतिरिक्त खर्च येणार आहे.

नव्या नियमांनुसार एटीएम सर्व्हिस प्रोव्हायरची एकूण संपत्ती कमीत कमी 100 कोटी असणे गरजेचे आहे. तसेच त्याच्याकडे 300 कॅश व्हॅन असायलाच हव्यात. प्रत्येक व्हॅनमध्ये दोन सुरक्षारक्षक आणि दोन बंदुकधारी सुरक्षारक्षक एका चालकासह असणे बंधनकारक केले आहे.

प्रत्येक व्हॅनमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही प्रणाली बसवावी लागणार आहे. याशिवाय सर्व एटीएम मशिनमध्ये विंडोज एक्सपीवरून विंडोज 10 अपग्रेड करावी लागणार आहे.

टॅग्स :एटीएमatm