बापरे! 'कोरोना पुन्हा होऊ शकतो हे नक्की, काळजी घेत राहा', डॉक्टरांच्या विधानाने वाढली चिंता

By सायली शिर्के | Published: November 22, 2020 12:52 PM2020-11-22T12:52:01+5:302020-11-22T13:08:22+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन काळजी घेणं सुरूच ठेवलं पाहिजे असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे. यामुळे लोकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. देशातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 90 लाखांचा टप्पा पार केला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. जगभरात संशोधन सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे.

कोरोनाची लागण पुन्हा होऊ शकते हे नक्की आहे असं नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. काही लोकांना पुन्हा एकदा कोरोना होऊ शकतो हे दिसले आहे असे डॉ. पॉल यांनी म्हटलं आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन काळजी घेणं सुरूच ठेवलं पाहिजे असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे. यामुळे लोकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

"लस ही केवळ एक टूल आहे. आपल्या सर्वांना कोरोनाबाबतचे सर्व नियम आणि सूचनांचे पालन करतच राहावं लागणार आहे' असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.

"लस ही केवळ एक टूल आहे. आपल्या सर्वांना कोरोनाबाबतचे सर्व नियम आणि सूचनांचे पालन करतच राहावं लागणार आहे' असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत कोरोना संसर्गाने शिखर गाठल्याचेही ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. "ही परिस्थिती पाहता लोकांनी व्यक्तिगत स्तरावर समजून घेतले पाहिजे. चाचणी आणि आयसोलेशनचे उपाय करावेच लागणार आहेत."

"आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या जवळपास 15 ते 20 जणांना आयसोलेशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण काळजी न घेतल्यास संसर्ग पसरू शकतो" असं डॉ. पॉल यांनी म्हटलं आहे.

ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, त्या व्यक्तीच्या दोन दिवस आधीपासून संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवणे आवश्यक असल्याचे डॉ. पॉल म्हणाले.

रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना 7 दिवस तरी क्वारंटआईन राहायला हवे. यामुळे त्यांचे कुटुंबीय किंवा इतरांना संसर्ग होणार नाही. त्यानंतर त्यांनी आपली चाचणी करावी, असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 45 हजार 209 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण रुग्णसंख्या 90 लाख 95 हजार 807 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा 1 लाख 33 हजार 227 वर गेला आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशनंतर आता आणखी एका राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच मास्क न लावल्यास दंड भरावा लागणार आहे.

राजस्थानमधील आठ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच मास्क न घातल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे. जयपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत राज्यातील कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जयपूर, जोधपूर, कोटा, बीकानेर, उदयपूर, अजमेर, अलवर आणि भीलवाडा या आठ जिल्ह्यांमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.