coronavirus: श्रमिक स्पेशल ट्रेन, कुणाला आणि कसा करता येईल प्रवास; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 11:44 AM2020-05-02T11:44:32+5:302020-05-02T12:05:55+5:30

कोरोना विषाणूच्या फैलावाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर, प्रवासी विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. दरम्यान, या लोकांना मोठा दिलासा देताना केंद्र सरकारने विशेष ट्रेन चालवून अशा लोगांना त्यांच्या गावांपर्यंत पोहोचवण्याची सूचना रेल्वेला केली आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजूर, प्रवासी विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. दरम्यान, या लोकांना मोठा दिलासा देताना केंद्र सरकारने विशेष ट्रेन चालवून अशा लोगांना त्यांच्या गावांपर्यंत पोहोचवण्याची सूचना रेल्वेला केली आहे.

त्यानुसार आता रेल्वेने श्रमिक स्पेशल रेल्वेसेवा सुरू केली आहे. दरम्यान, या ट्रेन पॉइंट टू पॉइंट म्हणजेच मधल्या कुठल्याही स्टेशनवर थांबू नयेत अशी विनंतर राज्य सरकारांनी स्टॅंडर्ड प्रोटोकॉलनुसार चालवण्यात याव्यात केली होती. दरम्यान, काल पहिल्या दिवशी शुक्रवारी विविध मार्गांवर सहा स्पेशल ट्रेन चालवण्यात आल्या होत्या.

या ट्रेन चालवण्यासाठी जिथून ही ट्रेन सुटणार आणि जिथे पोहोचणार आहे अशा दोन्ही राज्यांची सहमती आवश्यक आहे. या ट्रेनमध्ये सामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी नसेल. तसेच या ट्रेन सुरू करण्यासाठी सरकारने काही अटी घातल्या आहेत. त्यांचे पालन केल्यानंतरच अशा ट्रेन चालवता येतील. आता जाऊन घेउयात या ट्रेनमधू न कुणा कुणाला प्रवास करता येईल आणि त्यांच्यासाठी काय व्यवस्था असेल.

प्रवाशांची यादी तयार करण्यात येणार - या विशेष ट्रेनमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांची यादी राज्य सरकार तयार करेल. या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवासी मजूर, पर्यटक, विद्यार्थी, आणि यात्रेकरूंना आपल्या राज्याकडे अर्ज करावा लागेल. तेथील नोडल अधिकारी प्रवाशांची एक यादी तयार करतील ती रेल्वेला सोपवली जाईल. त्यानंतर प्रशासनाने निवड केलेल्या लोकांनाच स्टेशनवर पोहोचवण्यात येईल. यादीत नाव असलेल्यांशिवाय कुणालाही ट्रेनमध्ये बसू दिले जाणार नाही.

ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी होणार स्क्रिनिंग- ज्या राज्यातून ही ट्रेन रवाना होईल तिथे स्टेशनवर प्रवाशांच्या स्क्रिनिंगची व्यवस्था असेल. सर्व प्रवाशांना स्क्रिनिंगचा सामना केल्यानंतर आणि त्यात तंदुरुस्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच ट्रेनमध्ये बसू दिले जाईल. जर एखाद्या व्यक्तीमध्ये संशयास्पद लक्षणे दिसली तर त्याला त्याच्या राज्यात पाठवण्याऐवजी थेट क्वारेंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. तसेच ही ट्रेन संबंधित राज्यात पोहोचल्यावर तिथेही स्क्रिनिंग केले जाईल.

अशी असेल खानपानाची व्यवस्था - ज्या राज्यातून ट्रेन प्रवास सुरू करेल तिथे प्रवाशांच्या भोजन आणि उपाहाराची व्यवस्था केलेली असेल. त्यासाठी स्टेशनवर तशी व्यवस्था केली जाईल. तसेच प्रवासादरम्यान रेल्वेकडून भोजन उपलब्ध करून दिले जाईल

स्पेशल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांसाठी फेसमास्क आणि सोशल डिस्टंसिंग अनिवार्य असेल.

प्रवाशांची संख्या - रेल्वे म्हटली की समोर गर्दी येते. मात्र या विशेष ट्रेनमध्ये एका डब्यात केवळ ५४ प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी असेल. सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, सरकारकडून अशाप्रकारच्या ट्रेन चालवण्यात येत असल्याची माहिती मिळताच मुंबईतील मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, अनेक मजुरांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आपले अर्ज जमा केले आहेत.