CoronaVirus News: धोक्याचा इशारा! देशातील कोरोना रुग्णांची संख्या लवकरच ३३ ते ३५ लाखांवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 04:38 PM2021-04-22T16:38:06+5:302021-04-22T16:48:24+5:30

CoronaVirus News: मे महिन्याच्या मध्यावर देशात कोरोनाची दुसरी लाट टोक गाठणार

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक अतिशय झपाट्यानं वाढत आहे. देशात ५ एप्रिलला पहिल्यांदा दिवसभरात १ लाख कोरोना रुग्ण आढळून आले. पुढील १० दिवसांत हा आकडा २ लाखांवर पोहोचला.

आज पहिल्यांदा देशात ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली. दिवसाला २ लाख नवे कोरोना रग्ण ते दिवसाला ३ लाख कोरोना रुग्ण हा टप्पा अवघ्या सात दिवसांत गाठला गेला आहे.

पुढील आणखी काही दिवस देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज गणिती प्रारुपाच्या मदतीनं व्यक्त करण्यात आला आहे. ११ ते १५ मेच्या दरम्यान कोरोनाची दुसरी लाट टोक गाठेल, असा अंदाज आहे.

देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांचा आकडा पुढील तीन आठवडे तरी वाढेल असा अंदाज आयआयटी कानपूरकडून वर्तवण्यात आला आहे. गणितीय प्रारुपाच्या आधारे कोरोना प्रादुर्भावाचा वेग, वाढती रुग्णसंख्या याच्या आधारे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मेच्या मध्यावर कोरोनाची दुसरी लाट टोक गाठेल आणि त्यानंतर दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होऊ लागेल, अशी माहिती आयआयटी कानपूरच्या मणिंद्र अग्रवाल यांनी दिली.

११ ते १५ मे दरम्यान देशातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ३३ ते ३५ लाखांच्या घरात असेल. गेल्या सप्टेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली होती. १७ सप्टेंबरला लाटेनं टोक गाठलं होतं. तेव्हा देशातील ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा १० लाख होता.

देशाच्या धोरणकर्त्यांना कोरोना रुग्णवाढीची नेमकी माहिती मिळावी, त्यांना वैद्यकीय सुविधांची उभारणी करण्यासाठी तजवीज करता यावी या हेतूनं आयआयटी कानपूरनं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अभ्यास केला आहे.

दिल्ली, हरयाणा, राजस्थान आणि तेलंगणातील कोरोनाची लाट २५ ते ३० एप्रिल दरम्यान शिखरावर असेल, असा आयआयटी कानपूरचा अंदाज आहे.

ओदिशा, कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची लाट १ ते ५ मे दरम्यान टोक गाठेल. तर आंध्र प्रदेश, तमिळनाडूत हीच स्थिती ६ ते १० मेच्या दरम्यान येईल, असं आयआयटी कानपूरच्या टीमचा अभ्यास सांगतो.

महाराष्ट्र आणि छत्तीसगडसाठी दिलासादायक माहिती आहे. या दोन राज्यांत कोरोनाच्या लाटेनं टोक गाठलं असावं आणि आता येथील रुग्णांची संख्या कमी होत जाईल, असा अंदाज आहे.

देशातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा पुढील काही दिवस वाढतच जाईल. १ ते ५ मे दरम्यान तो टोक गाठेल. त्यावेळी दररोज कोरोनाचे ३.३ ते ३.५ लाख नवे रुग्ण सापडतील, अशी शक्यता आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यानं ११ ते १५ मे दरम्यान देशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३३ ते ३५ लाख इतकी असेल, असं आयआयटी कानपूरच्या मणिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं.