Coronavirus: कोरोनानं अनेकांना केलं बेरोजगार; देशात आणखी २ कोटी लोक गरीब होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 02:27 PM2020-09-06T14:27:41+5:302020-09-06T14:30:54+5:30

कोरोना विषाणूच्या महामारीनं कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने धुळीस मिळविली आहेत. वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. कोट्यवधी लोक गरीबीतून बाहेर पडत होते, भारताची शक्ती वाढत होती आणि ती आर्थिक महासत्ता होण्याचं स्वप्न बाळगून होती.

परंतु देशभरात निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे चिंता अनेक पटीने वाढली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था पुर्णपणे कोसळण्याच्या स्थितीत आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार काही अंदाजानुसार सुमारे २ कोटी लोक पुन्हा दारिद्र्यात जाऊ शकतात. बहुतेक तज्ज्ञ या नुकसानीचा दोष लॉकडाऊनला देत आहेत.

ज्या कारखान्यांनी पिढ्या उभ्या केल्या, त्या उत्पादनाचे उत्पादन आता आधीच्या १-१० इतके झाले आहे. याचं उदाहरण म्हणजे सुरत येथील टेक्सटाइल कारखाने पाहू शकता. हजारो कुटूंबांतील लोक जे साड्यांना फिनिशिंग टच देत होते ते आता भाजीपाला आणि दूध विकू लागले आहेत. मोबाइल फोनची दुकाने किंवा इतर काही स्टोअर असो, तिथे सन्नाटा पसरला आहे.

गेल्या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था वाढत असताना भारताची अर्थव्यवस्था २४ टक्के कमी झाली. अर्थशास्त्रज्ञ असेही म्हणतात की, जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था (अमेरिका, चीन, जपान, जर्मनीनंतर) असण्याचा अभिमानही भारत गमावू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लॉकडाउन कठोर होता पण त्यात अनेक त्रुटी असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणे आहे. यामुळे केवळ अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले नाही तर कोरोनाचा प्रसार देखील झपाट्याने झाला. भारतात आता कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत आणि दररोज ८० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

चीनच्या सीमेवर तणाव वाढत आहे. प्रसिद्ध लेखक अरुंधती रॉय यांनी न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना सांगितले की, "इंजिन खराब झाले आहे. जगण्याची क्षमता कमी झाली आहे. आणि त्याचे तुकडे हवेत फेकले गेले आहेत, ते केव्हा आणि कसे पडतील हे माहित नाही. अशा शब्दात अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे.

जवाहरलाल नेहरू येथील विकास अर्थशास्त्रज्ञ जयती घोष यांनी न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले की, स्वातंत्र्यानंतर हा बहुधा भारतातील सर्वात वाईट टप्पा आहे. लोकांकडे पैसे नाहीत. बाजार अस्तित्त्वात नसल्यास गुंतवणूकदार गुंतवणूक करणार नाहीत.

४ वर्षापूर्वी भारतात नोटाबंदी करुन ९० टक्के पेपर करेंसी बंद केली, भ्रष्टाचार कमी करणे आणि डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला. पण या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला. तशीच अतिघाई कोरोनाबाबतचा निर्णय घेण्यात झाली.

२४ मार्च रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन घोषित केले. लोकांना घरातच राहावे लागले. अनेक लोकांचे रोजगार गेले. प्रवासी मजुरांना कित्येक किमी पायपीट करावी लागली. लॉकडाऊनची अतिघाई अर्थव्यवस्थेसाठी जबाबदार आहे असं तज्त्र सांगतात.

जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ कौशिक बासु म्हणाले, "२०२० च्या दुसर्‍या तिमाहीतील मंदी संपूर्णपणे लॉकडाऊनच्या परिणामामुळे झाली आहे. महामारी नियंत्रणात आली असता तर त्याचा फायदा झाला असता, पण तसे झाले नाही." लॉकडाऊननंतरही कोरोनाची लागण होण्याची भीती कायम होती. मोदी सरकारने आपत्कालीन मदतीसाठी २० लाख कोटींची घोषणा केली, परंतु गरीबांना त्याचा फारसा फायदा झाला नाही. काही राज्यांकडे आरोग्य कर्मचार्‍यांना पैसे देण्याचे पैसेही नाहीत. गेल्या ४० वर्षात सरकारी कर्ज उच्च पातळी गाठत आहे.