CoronaVirus Live Updates : आनंदाची बातमी! देशातील तब्बल 430 जिल्ह्यांत गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 04:10 PM2021-03-30T16:10:42+5:302021-03-30T16:25:17+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाचा विस्फोट होत असताना सुखावणारी आकडेवारी आता समोर आली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णांचा आकडा 1,20,95,855 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,62,114 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 56,211 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 271 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

देशात कोरोनाचा विस्फोट होत असताना सुखावणारी आकडेवारी आता समोर आली आहे. देशातील तब्बल 430 जिल्ह्यांत गेल्या 28 दिवसांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नसल्याची माहिती मिळत आहे.

कोरोनाच्या संकटात यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. काही राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना देशात असे देखील काही जिल्हे आहेत. जिथे परिस्थितीत सुधारणा होत असून रुग्णांचे प्रमाण घटत आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशात गेल्या 28 दिवसांत तब्बल 430 जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नसल्याचं म्हटलं आहे. देशात कोरोनाबाबत स्थिती सध्यातरी नियंत्रणात आहे.

परिस्थिती नियंत्रणात असली तरी नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. यामुळे संसर्ग वाढू शकतो. कोरोनाची नियमावली पाळा देखील आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 8 राज्ये ही कोरोनाचा हब बनत असून येथे झपाट्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या राज्यांमध्ये एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येची 85 टक्के केसेस आहेत.

देशात कोरोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मे 2020 पेक्षा आता वाढ होत आहे.

एक कोरोना संक्रमित व्यक्ती कोणत्याही निर्बंधाशिवाय 30 दिवसांत सरासरी 406 लोकांना संक्रमित करू शकतो. मे 2020 नंतर कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या साप्ताहिक घटनांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे.

महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, तामिळनाडू, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, जम्मू कश्मीर, कर्नाटक, पंजाब आणि बिहार या राज्यांसाठी आणि केंद्र शासित प्रदेशांची बैठक घेण्यात आली.

आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. देशात मागील एका आठवड्यात आढळून आलेल्या प्रकरणांपैकी 59.8 टक्के रुग्ण याच जिल्ह्यांमधील आहेत असं म्हटलं आहे.

कोरोना व्हायरस आपलं स्वरुप सातत्याने बदलत असतो. भौगोलिक स्थितीनुसार ते वेगवेगळे असू शकतं. महत्त्वाचं म्हणजे त्याचा प्रादुर्भाव आणि त्याच्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं एन. के. मेहरा यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या नवीन प्रकाराने घाबरण्याची अजिबात गरज नाही. हा लवकरच संपेल. टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या तीन बाबींवर आपल्याला भर द्यायचा आहे. रोजच पूर्ण काळजी घ्यायची आहे. मास्क घालणं गरजेचं आहे, सोशल डिस्टन्सिंग राखा आणि हात सतत धूत राहा असं देखील म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरही मेहरा यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात डबल म्युटेशन असलेला कोरोना व्हायरस आढळून आला आहे. त्याचे नमुने समोर आले आहेत.

महाराष्ट्रात डबल म्युटेशन असलेल्या कोरोनामुळे संसर्ग वेगाने होत आहे. ही चिंतेची बाब आहे. पण कोरोनावरील जी लस आपल्याकडे आहे ती या डबल म्युटेशन्स असलेल्या नवीन कोरोनावरही प्रभावी आहे असं म्हटलं आहे.