Coronavirus: भारताच्या सुरक्षेला मोठा धोका; कोरोना संकटाआडून चीन आखतंय 'हे' षडयंत्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 01:27 PM2020-04-21T13:27:06+5:302020-04-21T13:34:04+5:30

जगात कोरोना व्हायरसचं संकट उभं असताना चीननं चालाखीनं नवीन शक्कल शोधून काढली आहे. दक्षिण आशियाई देशात कोरोनामुळे अनेक कंपन्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्याचा फायदा बीजिंग उचलण्याच्या तयारीत आहे.

कोरोनाच्या आडून चीनने दक्षिण आशियात आपली पावलं पुढं उचलण्यास सुरुवात केली आहे. महामारीमुळे ज्या कंपन्या आर्थिक डबघाईला आल्या आहेत या कंपन्यांना कर्ज देण्याची तयारी चीनने दाखवली आहे.

चीनची ही तयारी भारतासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. भारताशेजारील राष्ट्रांना चीन कर्जाच्या जाळ्यात ओढत आहे. कोरोनामुळे बिकट अवस्था झालेल्या या देशांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. लॉकडाऊनमुळे काही देशात आर्थिक व्यवस्थेला नुकसान पोहचलं आहे.

चीनकडून श्रीलंका, नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि मालदीव यांना सुरुवातीला कोविड १९ टेस्ट किट्स, पीपीई मास्क आणि इतर सुरक्षा उपकरणं पाठवण्यात आली आहेत. तत्पूर्वी जुना मित्र पाकिस्तानलाही चीनने मदत केली आहे.

चीनच्या आक्रमक रणनीतीविरोधात भारतानेही पाऊल उचललं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ मार्चला सार्क देशांच्या बैठकीत रणनीतीचं पहिलं पाऊल उचललं. भारताने शेजारील राष्ट्रांना औषधं आणि मेडिकल टीमदेखील पाठवली आहे. त्याचसोबत दक्षिण आशियाई देशात मेडिकल एक्सपर्टद्वारे वेबीनार्सचं आयोजन केलं आहे.

यामाध्यमातून भारताने महामारीशी मुकाबला करण्यासाठी प्रशिक्षण आणि व्यवस्थापन यांचं मार्गदर्शन शेजारील राष्ट्रांना करण्यात येत आहे. चीन दक्षिण आशियाई देशांना आर्थिक कर्ज देऊन आपल्या जाळ्यात ओढण्याची शक्यता आहे हे भारतासाठी चिंताजनक आहे. तज्ज्ञांच्या मते, यामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.

सरकारच्या सूत्रांनुसार भारत दक्षिण आशियाईतील शेजारील राष्ट्रांपर्यंत जेवढी शक्य आहे तितकी मदत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जे चीन करत आहे ते करणं भारतासाठी अडचणीचं ठरेल. चीनने श्रीलंकेला ५०० मिलियन डॉलर कर्ज दिलं आहे.

चीन श्रीलंकेप्रमाणे नेपाळ, बांग्लादेश आणि मालदीव यांना कर्ज देण्याच्या तयारीत आहे. यापूर्वीच श्रीलंकेने हिंद महासागरातील हंबनटोटा बंदर ९९ वर्षासाठी चीनच्या एका कंपनीला भाडेतत्त्वार दिलं आहे.

मालदीववर चीनचं ३ बिलियन डॉलर कर्ज आहे. या देशात चीनच्या अनेक कंपन्यांकडून विकासाचे प्रकल्प सुरु आहेत. चीन नेहमी विकासाच्या नावाखाली इतर देशांना कर्ज देतं पण त्यामागे बेल्ट एँड रोड प्रकल्पाला पुढे रेटण्याची रणनीती आखतं.

हा प्रकल्प चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा आवडता प्रकल्प आहे. सुरुवातीपासून याला भारताने विरोध केला आहे.जर भारताचे शेजारील राष्ट्र चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकले तर भारतासाठी मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे असं तज्ज्ञांना वाटतं.