CoronaVaccine: लस घेतल्यानंतर किती दिवस मिळेल संरक्षण?; केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 07:53 PM2021-07-30T19:53:26+5:302021-07-30T19:58:38+5:30

CoronaVaccine: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच उत्तम उपाय असल्याचे म्हटले जात आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला असला, तरी धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच उत्तम उपाय असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भारतासह जागतिक स्तरावरील सर्वच देश लसीकरणावर सर्वाधिक भर देत आहेत. भारतात तीन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत 44.19 कोटी लोकांना कोरोना विषाणू प्रतिबंधक लस दिली गेली आहे. मुलांसाठी कोरोना लस येत्या ऑगस्ट महिन्यात उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे.

देशात आताच्या घडीला सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड (covishield), भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (covaxin) आणि रशियाची स्फुटनिक व्ही या लसी नागरिकांना दिल्या जात आहे. तर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या लसी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. महाराष्ट्राचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास सांगतात, "पहिला डोस घेतल्यानंतर साधारणत: 42 दिवसांनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. पण, यासाठी लसीचा दुसरा डोसही घेणं गरजेचं आहे."

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती किती दिवस टिकेल हे अजूनही निर्धारित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणं, हात धूणं, सोशल डिस्टंसिंगचं पालन महत्त्वाचं आहे, असं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, देशभरात गुरुवारी 43,509 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 640 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 22,056 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 38,465 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत एकूण तीन कोटी 15 लाख 28 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 22 हजार 662 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 7 लाख 1 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोना रुग्णांची सक्रिय संख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 3 हजार 840 रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत.