CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट नेमकी कधी ओसरणार? जाणून घ्या देशाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 10:04 AM2021-04-12T10:04:39+5:302021-04-12T10:09:00+5:30

CoronaVirus News: देशात कोरोनाची दुसरी लाट; गेल्या सात दिवसांपासून दररोज १ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद

गेल्या वर्षी देशात कोरोनाची पहिली लाट पाहायला मिळाली. सप्टेंबरच्या मध्यावर देशातल्या कोरोना रुग्ण संख्येनं शिखर गाठलं. मात्र १६ सप्टेंबरनंतर कोरोनाची लाट ओसरू लागली.

१६ सप्टेंबरला देशात जवळपास ९८ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला.

२ फेब्रुवारीला देशात ८ हजार ६३५ रुग्ण आढळले. त्यानंतर मात्र कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्यानं वाढू लागली.

गेल्या सहा दिवसांपासून तर देशात दररोज १ लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

काल दिवसभरात देशात दीड लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. मृतांचा आकडादेखील दिवसागणिक वाढत आहे.

महाराष्ट्रात दररोज ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहे. देशात आतापर्यंत १ कोटी ३४ लाख जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातल्या १ लाख ७० हजार जणांना जीव गमवावा लागला आहे. तर सध्याच्या घडीला ११ लाखांहून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भीषण आहे, १३ राज्यांमधील स्थिती गंभीर असल्यानं विविध प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट नेमकी कधी ओसरणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. यासंदर्भात शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केलं. या संशोधनात आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांचादेखील सहभाग होता.

गणिती विश्लेषणाच्या आधारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार एप्रिलच्या मध्यापर्यंत कोरोनाची दुसरी लाट शिखर गाठेल. त्यानंतर रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल. देशाच्या विविध शहरांमध्ये लागू असलेल्या निर्बंधांमुळे रुग्ण संख्या घटेल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.

एप्रिलच्या मध्यावर कोरोना रुग्णांची संख्या शिखरावर असेल. त्यानंतर हळूहळू लाट ओसरू लागेल आणि मे महिन्यापर्यंत स्थिती सुधारलेली असेल. मात्र या कालावधीत देशाच्या वैद्यकीय क्षेत्राला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल.

वैद्यकीय संसाधनांच्या कमतरतेमुळे संकटांमध्ये भर पडेल. त्यातच फिजिकल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं पालन न केल्यास परिस्थिती सुधारण्यास आणखी विलंब लागेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.