...म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी देवीला पाजले मद्य, हंडी घेऊन घातली नगरप्रदक्षिणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 08:39 AM2021-04-21T08:39:03+5:302021-04-21T09:16:01+5:30

Collector of Ujjain offered liquor to the goddess : जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी मातेच्या मंदिरात हा मद्याचा प्रसाद अर्पण केला.

भगवान महाकालाचे नगर असलेल्या उज्जैनमध्ये मंगळवारी महाअष्टमीनिमित्त २४ खंभा माता मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी महालया आणि महामाया मातेला मद्याचा प्रसाद अर्पण करून महामारीतून सर्वांची मुक्तता करण्याची प्रार्थना केली.

उज्जैनमधील इतिहासातील प्रसिद्ध राजे विक्रमादित्य हे महालया आणि महामाया मातेची पूजा करत असत, असे सांगितले जाते. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. नवरात्रीदरम्यान, महाष्टमीच्या दिवशी देवीला मद्याचा प्रसाद अर्पण केला जातो. सध्या जिल्हाधिकारी हा विधी पार पाडतात.

यावर्षी जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी मातेच्या मंदिरात प्रसाद अर्पण केला. त्यानंतर २७ किमीपर्यंत मद्याची धार वाहून विविध भैरव मंदिरांमध्ये मद्याचा प्रसाद अर्पण केला. यादरम्यान जिल्हाधिकारी काही अंतरापर्यंत मद्याची हंडी घेऊन पायी चालले.

उज्जैनमध्ये अनेक ठिकाणी देवीची प्राचीन मंदिरे आहेत. इथे नवरात्रौत्सवात विशेष पूजापाठ केला जातो. य मांदिरांमध्ये २४ खंबा माता मंदिराचाही समावेश आहे. प्राचीन काळात भगवान महाकालेश्वर मंदिरात जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठीचा मार्ग २४ खांबांपासून बनवण्यात आला होता. या द्वाराच्या दोन्ही बाजूंना महामाया आणि महालया मातेच्या प्रतिमा स्थापित आहेत.

प्रसिद्ध सम्राट विक्रमादित्य हे या दोन्ही देवींची आराधना करत असत. त्यांच्याच काळापासून अष्टमीच्या दिवशी येथे शासकीय पूजा करण्याची परंपरा सुरू आहे. उज्जैननगरामध्ये प्रवेश करण्यासाठी प्राचीन द्वार आहे. तसेच नगररक्षणासाठी इथे २४ खांब स्थापित करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच याला २४ खंबा द्वार असे म्हणतात. देवीने शहराचे रक्षण करावे आणि महामारीपासून रक्षण करावे यासाठी इथे महाष्टमीदिवशी शासकीय पूजा आणि त्यानंतर पायी नगरपूजा केली जाते.

सुमारे २७ किमी लांबीच्या या महापूजेमध्ये ४० मंदिरांमध्ये मद्याचा प्रसाद अर्पण केला जातो. हा विधी सकाळी सुरू होऊन संध्याकाळी समाप्त होतो. यादरम्यान, उज्जैनमधील प्रसिद्ध मातेचे मंदिर असलेल्या २४ खंबा माता मंदिरापासून यात्रा सुरू होऊन ज्योर्तिलिंग महाकालेश्वराच्या मंदिराच्या शिखरावर ध्वज चढवून यात्रेची समाप्ती होते. या यात्रेमधील खास बाब म्हणजे एका मडक्यामध्ये मद्य भरून मडक्याच्या खाली छिद्र केले जाते. त्या शिद्रामधून शहरामध्ये संपूर्ण २७ किमीपर्यंत मद्याची धार वाहिली जाते. ती तुटत नाही.