महाराष्ट्रात सर्वाधिक चाचण्या नाहीत, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 10:06 PM2020-07-13T22:06:55+5:302020-07-13T22:39:07+5:30

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णांची होणारी गैरसोय यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकेरेंना पत्र लिहले आहे.

आपल्या पत्रातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आणि विभागीय भागातील कोरोना संदर्भातील परिस्थिती फडणवीस यांनी मांडली आहे.

मुंबईतील सरकारी रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असून विलिगीकरण कक्षात ना वेळेवर जेवण मिळते, ना पाणी. तर, दुसरीकडे खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट होत असल्याचेही फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तब्बल 6 पानी पत्र लिहिलं असून राज्यातील कोरोनाबाधित परिस्थिती आणि नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत.

'राज्यातील बहुतेक सर्व कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर आढळलेली निरीक्षणे, त्यावर राज्य सरकारच्या वतीने तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत हे पत्र लिहित असल्याचे फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले.

रुग्णालयाबाहेर झालेले 600 मृत्यू अद्याप मुंबई महापालिकेनं जाहीर केले नाहीत, त्यासंदर्भातील आकडेवारीचा तात्काळ पडताळणी करावी

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन, बेडची संख्या वाढवावी, तसेच व्हेंटीलेटर आणि ऑक्सीजनयुक्त बेड उपलब्ध करुन द्यावेत

राज्यात सर्वाधिक चाचण्या झाल्या म्हणून रुग्णसंख्या जास्त हे गृहितच चुकीचं आहे, कारण प्रतिदहालाख लोकसंख्येमागे चाचण्या करण्यात महाराष्ट्र देशात नवव्या क्रमांकावर आहे.

रुग्णांना 14 तास ते 30 तासांपर्यंत रुग्णालयात प्रवेश मिळत नाही, रुग्णवाहिकाही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत.

मनुष्यबळाचा अभाव असून केवळ 30 ते 40 टक्के स्टाफच्या जीवावार आरोग्ययंत्रणा जीवाचं रान करताना दिसून येत आहे.

खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे सामान्य माणूस तेथे जाण्यास धजावत नाही

अॅक्टमेरा आणि रेमडेसीवीर या औषधांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. ही औषधे बाजारात उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.

फडणवीसांनी आपल्या पत्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई या विभागांसाठी स्वतंत्रपणे काय उपाययोजनांची गरज आहे, हेही स्पष्टपणे सांगितले आहे.

सोलापूरात अद्यापही डॅशबोर्ड तयार केलेला नाही, त्यामुळे रुग्णांना इकडे-तिकडे भटकावे लागत आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद येथे रुग्णसंख्या वाढत आहे, खासगी रुग्णालयांची मनमानी सुरू आहे

चाचण्यांचे अहवाल येण्यास 3-3 दिवस लागतात, त्यामुळे कोरोना असलेल्या आणि नसलेल्या दोन्ही रुग्णांवर उशिराने उपचार होत आहेत