Cyclone Nisarga: चक्रीवादळाने दिशा बदलल्याने मुंबई अन् ठाण्यातील मच्छीमारांसाठी धोका टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 08:11 PM2020-06-03T20:11:04+5:302020-06-03T20:27:21+5:30

Cyclone Nisarga: निसर्ग या चक्रीवादळाने दिशा बदलल्याने भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक या समुद्र किना-यावरील गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

जोरदार वादळी वा-यासह आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मुंबई अन् ठाण्यातील समुद्र किनाऱ्यावरील नागरिक आणि मच्छीमारांना जोरदार फटका बसला आहे.

निसर्ग या चक्रीवादळाने दिशा बदलल्याने भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक या समुद्र किना-यावरील गावांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु वादळाच्या शक्यतेने बोटी व त्यातील साहित्य सुखरुप ठेवण्यासाठी मच्छीमारांची मोठी तारांबळ उडाली.

सुकवत ठेवलेली मासळी भिजून नुकसान झाले. प्रशासनाने खबरदारी म्हणून काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. वादळी वारे व पावसामुळे शहरात 10 ठिकाणी झाडं पडल्याच्या तर भाईंदर पोलीस ठाणे बाहेरील मंडप शेड पडल्याची घटना घडली.

चक्रीवादळ येण्याच्या शक्यतेने समुद्र किनारी एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले होते. या शिवाय अग्निशमन दल, पोलीस व तटरक्षक दलसुद्धा सज्ज होते.

निसर्ग चक्रीवादळामुळे सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम होता. शिवाय सातत्याने वाहत असलेल्या वाऱ्याचा वेगही कायम होता. दुपारी पावसाचा आणि वाऱ्याचा वेग वाढू लागला असतानाच ठिकठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.

महापालिकेतर्फे सुमारे ३५ शाळा आतापर्यंत नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी निश्चित करण्यात होत्या. आणि तेथे स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले होते.

रेस्क्यू बोट, जेट स्की आदी तैनात करण्यात आले होत्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या एकूण ८ तुकड्या, नौदलाच्या ५ तुकड्या मुंबईसाठी विविध ठिकाणी करण्यात आल्या होत्या. यामध्ये कुलाबा, वरळी, वांद्रे, अंधेरी, मालाड आणि बोरिवलीचा समावेश होता.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी व संभाव्य धोका असलेल्या मुंबईतील विविध भागांतून सुमारे २० ते २५ हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले.

स्थलांतरीत नागरिकांसाठी निवा-यासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. चक्रीवादळ ओसरल्यानंतर घरी परतण्यापूवी या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे देखील निर्देश देण्यात होते.

नियंत्रण कक्षात असलेल्या ५ हजारापेक्षा अधिक कॅमेऱ्यांद्वारे घडामोडींवर नजर ठेवण्यात आली होती. पाणी साचण्याच्या संभाव्य ३०० पेक्षा अधिक ठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप उपलब्ध करण्यात आले होते.