शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उद्धव ठाकरे : बाळासाहेबांचा वारसदार ते महाराष्ट्राच्या राजकारणातील यशस्वी रणनीतीकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 1:09 PM

1 / 11
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाचा घेतलेला हा आढावा...
2 / 11
बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तरकाळात शिवसेनेची सुत्रे हळूहळू उद्धव ठाकरे यांच्याकडे गेली. मात्र त्यांची तुलना नेहमीच बाळासाहेबांशी केली गेली. त्यांच्याकडे स्वतंत्र नेतृत्व म्हणून न पाहता बाळासाहेबांचे वारसदार म्हणून पाहिले गेले. मात्र हळुहळू उद्धव ठाकरे यांनी राजकारणातील सगळे खाचखळगे आत्मसात करून मोठी झेप घेतली आणि आपण बाळासाहेबांचे सक्षम वारसदार असल्याचे सिद्ध केले.
3 / 11
. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज ५३ वर्षांची असून तिची सूत्रे सांभाळणारे उद्धव ठाकरे यांच्यात आणि त्यांच्या वडलांमध्ये साम्यस्थळांपेक्षा भिन्नस्थळे अधिक आहेत. बाळासाहेब आक्रमक होते तर उद्धव शांत आहेत. उद्धव यांचे शांत नेतृत्व यांचे हा त्यांचा कमकुवतपणा समजला गेला. मात्र उद्धव यांनी त्यालाच बलस्थान बनवले.
4 / 11
उद्धव यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वामुळे बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेना टिकणार नाही, असे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. भाजपचे नेतेही खासगीत अशी भाषा बोलू लागले. मीडियातही त्याचीच री ओढली गेली. उद्धव हे फारसे कुणाच्या संपर्कात नसत. फोन घेत नसत. मात्र बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी मवाळ पण चिवट नेतृत्वाने शिवसेना टिकवली आणि वाढवली.
5 / 11
बाळासाहेब ठाकरेंसारख्या बुलंद नेतृत्वाचा वारसा पुढे चालवताना उद्धव ठाकरे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकीकडे बाळासाहेबांच्या हयातीतच नारायण राणेंसारखे नेते उद्धव ठाकरेंना दोष देत शिवसेनेतून बाहेर गेले होते. तर भाऊ राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडताना उद्धव ठाकरेंकडेच बोट दाखवले होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेृतृत्वाबाबत शंका निर्माण झाली होती. त्यात सुरुवातीच्या काळात राज ठाकरेंची मनसे शिवसेनेला चांगलीच टक्कर देत होती, अशा कठीण परिस्थितीतून वाट काढत उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पुढे नेले.
6 / 11
२००९ च्या निवडणुकीत राज यांच्या मनसेनी शिवसेनेला जोरदार तडाखा दिला. त्यामुळे भाजपचे नेते मनातून आनंदीत झाले. यापुढे राज हेच बाळासाहेबांचा वारसा चालवणार, ही भावना पुन्हा प्रबळ झाली. मात्र मनसेला सुरुवातीच्या काळातील जोश पुढे कायम ठेवता आला नाही. उलट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना एका दिशेने वाटचाल करत राहिली.
7 / 11
बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेचे महत्त्व कमी करणे सहज शक्य असल्याची भाजप नेत्यांची पक्की खात्री होती. त्यातून २०१४ मध्ये भाजपपुढे झुकायचे नाही, असे ठरवून शिवसेनेनी १५१ चे मिशन आरंभले. युती तुटली तेव्हा बाळासाहेबांची शिवसेना भाजप संपवू पहात असल्याचा प्रचार करुन उद्धव यांनी ६३ आमदार निवडून आणले. बाळासाहेब हयात नाहीत, राणे यांच्यासारखा रसद पुरवणारे नेता नाही, राज यांच्यासारखा स्टार प्रचारक नाही तरी आपल्या जेमतेम वक्तृत्वावर व नेमस्त सैनिकांच्या भरवशावर इतके यश मिळवू शकतो, यामुळे उद्धव यांचा आत्मविश्वास दुणावला.
8 / 11
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर शिवसेना निकालांनंतर काही महिन्यांनी पुन्हा भाजपासोबत सरकारमध्ये आली. मात्र यानंतरच्या काळात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील संबंध पूर्वीसारखे राहिले नाही. सरकारमध्ये सहभागी असूनही शिवसेना कायम भाजपावर टीका करत राहिली. एकीकडे उद्धव ठाकरे भाजपानेत्यांशी मवाळ संबंध ठेवायचे, तर ते संपादक असलेल्या सामनामधून भाजपावर जोरदार टीकास्र सोडले जाई.
9 / 11
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पुढाकार घेऊन शिवसेनेशी युती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर उद्धव यांनी कठोर तडजोडी करून लोकसभेसाठी अधिकच्या जागा शिवसेनेच्या पदरात पाडून घेतल्या. तसेच २०१४ प्रमाणेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आणण्यात यश मिळवले.
10 / 11
दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीनंतर जे नाट्य घडले त्यातून उद्धव ठाकरे हे केवळ आक्रमक भूमिकाच घेऊ शकत नाहीत तर ते कुशल रणनीतीकारदेखील आहेत हे सिद्ध झाले. त्यांनी घेतलेली कणखर भूमिका आणि प्रभावी रणनीतीमुळे विधानसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकणाऱ्या भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी होऊन राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला.
11 / 11
दरम्यान, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काही दिवसांतच राज्यासमोर कोरोनाचे आव्हान उभे राहिले. या काळात उद्धव ठाकरे यांनी राज्याला कुशल नेतृ्त्व दिले. त्यांनी संकटकाळाता जनतेला केलेल्या आवाहनाला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच विविध संस्थादेखील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत आहेत.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र