दोनाचे चार नव्हे, सहा हात; तरुणानं एकाचवेळी दोघींशी बांधली लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 11:29 AM2020-07-11T11:29:11+5:302020-07-11T11:34:55+5:30

मध्य प्रदेशातल्या बेतूल जिल्ह्यातल्या घोडाडोंगरी तालुक्यातल्या केरिया गावात एक वेगळाच विवाह सोहळा संपन्न झाला. हा विवाह सोहळा सध्या आसपासच्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

बेतूलमधील एका तरुणानं एकाच वेळी दोन तरुणींशी विवाह केला. विशेष म्हणजे या लग्नाला तिन्ही कुटुंबातील मंडळी उपस्थित होती. ग्रामस्थदेखील या सोहळ्यात सहभागी झाले होते.

मंडपात एक वर आणि दोन वधू असं कधीही न दिसणारं दृश्य पाहायला मिळाल्यानं सध्या सर्वत्र या लग्नाची चर्चा सुरू आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

केरिया गावाचे रहिवासी असलेला आदिवासी तरुण संदीप उईके यानं होशंगाबाद जिल्ह्यातील तरुणी आणि घोडाडोंगरी तालुक्यातल्या कोयलारी गावातल्या तरुणीशी विवाह केला.

संदीप भोपाळला शिक्षणासाठी गेला होता. त्यावेळी त्याची भेट मूळ होशंगाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या तरुणीशी झाली. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

तरुण भोपाळला शिकायला गेला असताना त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यासाठी स्थळं पाहण्यास सुरुवात केली आणि कोयलारी गावातल्या एका तरुणीसोबत त्याचं लग्न ठरवलं.

दोन तरुणीसोबत विवाह ठरल्यानं मोठाच पेचप्रसंग निर्माण झाला. त्यामुळे तिन्ही कुटुंब आणि गावातल्या लोकांनी बैठक बोलावली.

दोन्ही तरुणी तरुणासोबत राहण्यास, सोबत नांदण्यास तयार असल्यास लग्न निर्वघ्नपणे पार पडू शकतं, असा निर्णय बैठकीत झाला. दोन्ही तरुणींनी याला पसंती दर्शवली.

तरुणींनी संमती दर्शवल्यानंतर तरुणानं दोन्ही तरुणींसोबत सप्तपदी घेतली. या विवाहाला तिन्ही कुटुंबांचे सदस्य, त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

या लग्नाला आपण परवानगी देण्यात आली नव्हती अशी माहिती घोडाडोंगरच्या तहसीलदार मोनिका विश्वकर्मा यांनी दिली. या घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :लग्नmarriage