'मोदी गेल्यानंतर भारत-पाक संबंध सुधारतील', असं का म्हणाले पाक पंतप्रधान इम्रान खान?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 11:59 AM2021-06-26T11:59:12+5:302021-06-26T12:03:43+5:30

मोदी सरकारसोबतच्या संबंधांबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नेहमीच गोंधळलेले पाहायला मिळाले आहेत. नुकतंच एका अमेरिकी प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान केलं.

मोदी सरकारची भारतातून गच्छंती झाल्यानंतरच भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा होईल, असं विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेनुसार वागतात त्यामुळे भारतातलं सरकार आरएसएस प्रेरित असल्याचा आरोप देखील इम्रान खान यांनी यावेळी केला आहे.

याआधी इम्रान खान यांनी २०१९ साली भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले तर काश्मीरप्रश्नी चर्चा पुढे जाऊ शकते, असं विधान केलं होतं.

मोदींबाबत विधान करण्याआधी इम्रान खान यांनी आधी भारतावर स्तुतीसुमनं उधळली. इतर कोणत्याही पाकिस्तानी नागरिकापेक्षा भारताला मी खूप जवळून ओळखतो. इतर कोणत्याही देशापेक्षा मला भारताकडून अधिक मानसन्मान मिळाला आहे. कारण क्रिकेट एक मोठा खेळ आहे आणि दोन्ही देशांमध्ये हा खेळ एका धर्मासारखाच आहे, असं इम्रान खान म्हणाले.

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला होता, असंही इम्रान खान यांनी यावेळी सांगितलं. पाकिस्तानातील गरीबी दूर करणं आपलं मुख्य उद्दीष्ट असल्याचं इम्रान खान यांनी त्यावेळी मोदींना सांगितलं होतं.

गरीबी दूर करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारी संबंध चांगले ठेवणं अतिशय गरजेचं असल्याचं तेव्हा मोदींना सांगितलं होतं, असं इम्रान खान म्हणाले होते. याचा दोन्ही देशांना फायदा होईल, असंही ते म्हणाले होते.

भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. आरएसएसची एक वेगळीच विचारधारा आहे आणि याच विचारधारेशी मोदींचा संबंध आहे. त्यामुळे भारताचं नेतृत्व दुसऱ्या कुणाच्या हातात असतं तर नक्कीच भारतासोबतचे संबंध आज चांगले असते, असं इम्रान खान यावेळी म्हणाले.

दोन्ही देशांमध्ये आज चर्चा झाली असती आणि मतभेदांवर तोडगा निघाला असता, असंही इम्रान खान म्हणाले. पाक पंतप्रधानांच्या या विधानावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काश्मीरमधील सद्यस्थिती कायम राहिली तर हा भारताचा विजय तुम्ही समजाल का? असं इम्रान यांना विचारण्यात आलं असता त्यांनी हा मुद्दा भारतासाठीच अधिक तापदायक ठरू शकतो असं विधान केलं आहे.