सुन्नी पाकिस्तान, शिया इराण, दोन मुस्लीम देशांमध्ये युद्ध; कुणाला फायदा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 08:30 PM2024-01-19T20:30:22+5:302024-01-19T20:37:19+5:30

इराणने मंगळवारी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तिथल्या जमिनीवर असलेल्या दहशतवादी संघटना जैश अल अदलवर ठिकाणांवर एअरस्ट्राईक केले. या घटनेने जगाला धक्का दिला. इराणच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही ४८ तासांच्या पलटवार केला. गुरुवारी पहाटे इराणच्या सीमेपासून ५० किमी अंतरावर बॉम्ब हल्ला केला, ज्यामध्ये सात लोक मारले गेले.

या घटनेनंतर इराण आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचे कारण असे की दोन्ही देशांना या बाबतीत माघार घ्यायची नाही. दोन्ही देशांचे सैन्य खूप शक्तिशाली आहे. आतापर्यंतच्या युद्धाचा फायदा कोणाला झाला आणि युद्ध वाढले तर कोणाला फायदा होऊ शकतो? यावर अमेरिकेतील प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ मुक्तदार खान यांनी त्यांचे मत मांडले आहे.

तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानने ज्या वेगाने प्रत्युत्तर दिले ते आश्चर्यकारक आहे. पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यापूर्वी अमेरिकेशी काही संपर्क केला होता का आणि असीम मुनीरनेही इतक्या लवकर अमेरिकेशी चर्चा केली होती का? या हल्ल्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून सिग्नल मिळाले का, हा मोठा प्रश्न आहे.

हा हल्ला पाकिस्ताननं स्वतःहून केला असला तरी त्याच्या दृष्टिकोनातून तो आवश्यक वाटतो. यातून पाकिस्तानच्या लष्कराला दोन मोठे फायदे झाले आहेत. पहिले म्हणजे अमेरिका आणि भारतानंतर इराणच्या हल्ल्याने पाकिस्तानमध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. देशाचे सार्वभौमत्व कोणीही गांभीर्याने घेत नाही अशी टीका होऊ लागली.

अशा परिस्थितीत इराणमध्ये बदला घेणे हे त्याच्यासाठी धोकादायक पण आवश्यक पाऊल होते. जेणेकरून तो जगाला सांगू शकेल की आपणही प्रत्युत्तर देऊ शकतो. यामुळे पाकिस्तानला त्याच्या लोकांमध्ये आत्मविश्वास मिळेल. याशिवाय दुसरा फायदा असा होईल की, अलीकडच्या काळात इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्करावर केलेले आरोप आणि ज्या प्रकारे त्यांना लोकशाहीचा शत्रू ठरवण्यात आले आहे, तेही काही प्रमाणात मागे जाईल.

अमेरिका इराणवर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग शोधत आहे. विशेषतः इराणच्या समर्थित गटांनी लाल समुद्र आणि इतर काही ठिकाणी अमेरिका आणि इस्रायलला त्रास दिला आहे. अशा परिस्थितीत युद्ध वाढले तर पाकिस्तानला अमेरिकेकडून मदत मिळू शकते. पाकिस्तानला अमेरिकेकडून लष्करी मदत मिळू शकते आणि कर्जही मिळू शकते. पाकिस्तानला पुन्हा अमेरिकेच्या जवळ येण्याची ही संधी ठरू शकते.

अरब देश आणि विशेषत: सुन्नी बहुसंख्य देश इराणच्या वाढत्या सामर्थ्याने चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत इराण आणि पाकिस्तानमधील संघर्ष वाढल्यास अरब देशांकडूनही काही मदत मिळू शकते. अशा स्थितीत हा संघर्ष आणखी वाढल्यास पाकिस्तानला काही प्रमाणात फायदा होताना दिसत आहे.

त्याच वेळी, त्याच्या अलीकडील हल्ल्यामुळे इराणचा अरब जगतातील प्रभावही कमी झाला आहे. तथापि, दोन्ही देशांना दीर्घ युद्धात अडकायला आवडणार नाही आणि त्यामुळे काही गोष्टी चर्चेने सोडवल्या जातील असा बहुतेक तज्ञांचा असा दावा आहे.

दरम्यान, ९०९ किमी लांबीच्या सीमेवर इराण आणि पाकिस्तानचं सैन्य समोरासमोर आले आहे. सैनिक आणि शस्त्रात्रे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात जमा झालेत. एकीकडे इराणचा सिस्तान प्रांत आहे तर दुसरीकडे पाकिस्तानचा बलूचिस्तान प्रांत या सीमेला लागून आहे. ही जागा कुह ए मलिक सालीह डोंगराळ भाग आहे. या भागाच्या दक्षिण पश्चिमेस तहलब नदी आणि पूर्वेकडे मश्किल नदी आहे. दक्षिणेच्या दिशेला नहंग नदी असून डोंगराच्या पलीकडे तुम्ही ग्वादर खाडी आणि अमन खाडीपर्यंत जाऊ शकता.

या भागासाठी इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात कायम संघर्ष असतो. १८ व्या शतकात ब्रिटीश सरकारने भारताच्या बहुतांश भागावर कब्जा केला होता. पाकिस्तान तेव्हा भारताचा भाग होता. तेव्हा १८७१ मध्ये ब्रिटीश सरकार आणि इराण यांच्यात सीमा करार होऊन दोन्ही देशांची सीमा निश्चित केली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान वेगळा झाला. पाकिस्तानने इराणसोबत १९५८-५९ मध्ये सीमा आखून घेतली. त्या मैदानात पिलर्स उभे केले. जून २०२३ मध्ये या सीमेजवळ एक दहशतवादी हल्ला झाला. त्यात पाकिस्तानी सीमेवर तैनात काही सैनिक मारले गेले. त्यानंतर काही दिवसांत याच सीमेवर इराणच्या बाजूस दहशतवादी हल्ला झाला. त्यात ५ इराणी सैनिक मारले गेले.