कंगाल पाकिस्तानच्या हाती लागला खजिना, नदीत सापडलं सोनं, गोळा करण्यासाठी लोकांची उडाली झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:43 IST2025-02-18T13:39:05+5:302025-02-18T13:43:43+5:30
Pakistan Gold News: दहशतवाद आणि अंतर्गत संघर्षाने पोखरल्या गेलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था मागच्या काही वर्षात डबघाईला आलेली आहे. अशा परिस्थितीत आर्थिक मदतीसाठी जगभरात हात पसरत फिरत असलेल्या पाकिस्तानच्या हाती खजिना लागला असून, येथील सिंधू नदीमध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत. नदीत सोनं सापडत असल्याचं समजल्यापासून येथील सोनं गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे.

दहशतवाद आणि अंतर्गत संघर्षाने पोखरल्या गेलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था मागच्या काही वर्षात डबघाईला आलेली आहे. अशा परिस्थितीत आर्थिक मदतीसाठी जगभरात हात पसरत फिरत असलेल्या पाकिस्तानच्या हाती खजिना लागला असून, येथील सिंधू नदीमध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत. नदीत सोनं सापडत असल्याचं समजल्यापासून येथील सोनं गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडत आहे.
पाकिस्तानमधील सिंधू नदीमध्ये सुमारे ८०० अब्ज पाकिस्तानी रुपये एवढ्या किमतीचं सोनं सापडलं आहे. या सोन्याचं वजन सुमारे ६५३ टन एवढं आहे. हे सोनं मिळवण्यासाठी लोक नदी पात्राकडे धाव घेत आहेत.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमधील एका अहवालानुसार सोनं मिळवण्यासाठी लोक दिवसभर नदीच्या पात्रात भांडीकुंडी घेऊन सोनं गोळा करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर स्लुइस मॅटचा वापर करून सोनं बाहेर काढलं आहे.
पाकिस्तानमधील पंजाबचे माजी खाण आणि खनिजमंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी पाकिस्तानचे भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या एका अहवालाच्या आधारावर अटकजवळ ८०० अब्ज रुपयांचं सोन्याचे साठे सापडल्याची माहिती दिली होती.
हसन मुराद यांनी दावा केला की, सोन्याचे साठे सापडल्याने पाकिस्तानचं नशीब बदलू शकतं. त्यांनी सांगितले की, येथे १८ हजारहून अधिक भागामध्ये सोनं सापडू शकतं. पूर्ण नऊ ब्लॉक असलेल्या या परिसरातील सर्वात मोठ्या ब्लॉकमध्ये १५५ अब्जांपर्यंतचं सोनं असू शकतं.
डॉनच्या अहवालानुसार आधी या परिसरामध्ये कमी प्रमाणात सोन्याचं खोदकाम होत असे. मात्र मागच्या काही काळाता येथे मोठ्या संख्येने लोक सोन्याच्या शोधात येत आहेत. तसेच नदीच्या तळापर्यंत जाऊन सोनं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र सिंधू नदीमध्ये सोन्याच्या शोधासाठी सुरू असलेल्या खोदकामाबाबत पर्यावरणवाद्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते नदीच्या तळाला होणाऱ्या प्रमाणाबाहेरील खोदकामामुळे पाण्यामधील जीवसृष्टीवर परिणाम होऊ शकतो. तसेच सोनं काढण्यासाठी पाऱ्याचा वापर होत असल्याने नदीची इकोसिस्टिम बिघडू शकते.