पुढच्यावर्षी जुलैनंतर 5 पैकी एका व्यक्तीला मिळणार कोरोनाची लस; जाणून घ्या सरकारचा 'हा' प्लॅन

By manali.bagul | Published: October 5, 2020 11:25 AM2020-10-05T11:25:08+5:302020-10-05T11:46:40+5:30

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या माहामारीत कोरोनाची लस आणि औषध कधी येणार याचीच सगळ्यांना प्रतिक्षा आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काल महत्वाची घोषणा केली. यानंतर लसीच्या प्रतिक्षेत असलेल्या सगळ्याच भारतीयांना आशेचा किरण दिसला आहे.

पुढच्या वर्षी जुलै महिन्यापर्यंत भारतातील कोट्यावधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचं लक्ष्य असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र ही लस 5 पैकी केवळ एका व्यक्तीला मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

भारतात ४०० ते ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. साधारणपणे भारतातील २० ते २५ कोटी लोकांपर्यंत पुढच्या वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे.

आरोग्य मंत्र्यानी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ जुलैपर्यंत लस उपलब्ध होणार असून सुरुवातीला ही लस डॉक्‍टर, नर्स, पॅरामेडिक्‍स सारख्या आरोग्य विभागारीत कर्मचाऱ्यांना सगळ्यात आधी दिली जाणार आहे. याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचं ते म्हणाले.

सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची लस, भारत बायोटेक आणि जॉन्सन अॅण्ड जॉन्सन या ३ कंपन्यांकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. ICMR-भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या Covaxin या लशीची सध्या दुसऱ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे.

ऑक्सफर्ड-अस्त्राजेनेका आणि सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या Covishield या लसीची 2/3 टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

झायडस कॅडिलाची ZyCov-D या लसीची चाचणी माणसांवर सुरू आहे.