मुकेश अंबानींच्या या कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं करोडपती! रॉकेट बनलाय शेअर; खरेदीसाठी लोकांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 07:25 PM2024-02-17T19:25:37+5:302024-02-17T19:33:18+5:30

महत्वाचे म्हणजे, ही कंपनी जगातील टॉप-50 सर्वाधिक मूल्य असलेल्या कंपन्यांमध्ये सामील झाली आहे.

दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना जबरदस्त परतावा मिळाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही 20 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप ओलांडणारी पहिली सूचीबद्ध भारतीय कंपनी आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 5 वर्षांपेक्षाही कमी कालावधीत आपल्या मार्केट कॅपमध्ये 10 लाख कोटी रुपये जोडले आहेत. महत्वाचे म्हणजे, ही कंपनी जगातील टॉप-50 सर्वाधिक मूल्य असलेल्या कंपन्यांमध्ये सामील झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे. या शेअरने बुधवारी 2966.60 रुपयांचा नवा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. ट्रेडिंग आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात शुक्रवारी, रिलायन्सचा शेअर 2,925.00 रुपयांवर बंद झाला.

रिलायन्स इंडस्ट्रीजने 2005 मध्ये 1 लाख कोटी रुपयांचा एमकॅप मिळवला होता. आता कंपनीचे मूल्य 20 लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाले आहे. एक लाख कोटी रुपये ते 20 लाख कोटी रुपयांपर्यंतच्या या प्रवासात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांनाही बंपर परतावा दिला आहे.

साधारणपणे 20 वर्षांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत केवळ 110 रुपये एवढी होती. आज हा शेअर 3000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. याचा विचार करता, फेब्रुवारी 2005 पासून आतापर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत 2600 टक्क्यांनी वाढली आहे.

या शेअरचा भाव जवळपास 27 पट वधारला आहे. तसेच जुलै 2002 पासून आतापर्यंत हा शेअर जवळपास 5,500 टक्के अर्थात 56 पट मजबूत झाला आहे. तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत केवळ 53 रुपये एवढी होती.

गुंतवणूकदार झाले करोडपती - रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरची किंमत 1990 मध्ये 11.74 रुपये एवढी होती. जर आपण तेव्हा या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर आपल्याला कंपनीचे 851 शेअर मिळाले असते. हे शेअर आपण आज 2024 मध्ये अर्थात 34 वर्षांनंतर विकले असते, तर या शेअर्सची एकूण व्हॅल्यू 25.20 लाख रुपये एवढी झाली असती.

तसेच, आपण त्यावेळी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता तिचे मूल्य 2.52 कोटी रुपये झाले असते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)