शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनाकाळात नोकरी गेल्यास असा मिळवा बेरोजगारी भत्ता, असे आहेत नियम आणि अटीशर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:17 AM

1 / 12
कोरोनाचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली बेरोजगारी विचारात घेऊन केंद्र सरकारने अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेला एक वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत ईएसआयसीकडून बेरोजगारी भत्ता मिळतो.
2 / 12
दरम्यान, याबाबतचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. व्यवसाय बंद पडल्याने किंवा उद्योग बंद पडल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत मार्च ते डिसेंबर या काळात कुणाचा नोकरी गेली तर अशा कर्मचाऱ्यांना सरकारकडून बेरोजगारी भत्ता देण्यात येणार आहे.
3 / 12
कोरोना संकटामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण घरी गेल्याने, कंपन्या बंद असल्याने बेरोजगार झाले आहेत. अशा औद्योगिक कामगारांना त्यांच्या तीन महिन्याच्या पगाराच्या सरासरीच्या 50 टक्के रक्कम अनएम्पलॉयमेंट बेनिफिटच्या रुपात दिली जाणार आहे.   हा फायदा त्याच कामगारांना मिळणार आहे, ज्यांच्या नोकऱ्या 24 मार्च ते 31 डिसेंबर पर्यंत गेल्या आहेत. ईएसआयसीमध्ये नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांनाच हा भत्ता मिळणार आहे.
4 / 12
जर तुम्ही संघटीत क्षेत्रात काम करत असाल आणि तुमची कंपनी तुमचा पीएफ, ईएसआय कापत असेल तर मोदी सरकारने तुमच्यासाठी दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. आता जर कुठल्याही कारणाने तुमचा रोजगार गेला तर केंद्र सरकार तुम्हाला पैसे देईल. अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेंतर्गत तुमची नोकरी गेल्यास सरकार तुम्हाला आर्थिक मदत देईल. तसेच कुठल्याही कारणाने तुमचा रोजगार गेल्यास त्याचा अर्थ तुमची मिळकतीचे नुकसान होणे असे नाही.
5 / 12
अटल बिमित व्यक्ती कल्याण योजना १ जुलै २०१८ पासून प्रायोगिक तत्त्वावर दोन वर्षांसाठी सुरू झाली होती. त्यामुळे तिचा कालावधी ३० जून २०२० रोजी संपला आहे. मात्र आता या योजनेचा कालावधी एका वर्षासाठी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
6 / 12
अटल बिमित कल्याण योजनेचा फायदा घेण्यासाठी या योजनेमध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे. ईएसआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन तुम्गी अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता. हा फॉर्म योग्य पद्धतीने भरून राज्य विमा निगमच्या कुठल्याही जवळच्या शाखेत जमा करावा लागेल.
7 / 12
जे कर्मचारी किमान गेल्या दोन वर्षांपासून ईएसआयशी जोडले गेलेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. १ एप्रिल २०१८ चे ३१ मार्च २०२० पर्यंत या स्कीमशी जोडल्या गेलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. तसेच या कर्मचाऱ्यांनी १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या काळात किमान ७८ दिवस काम केलेले असणे आवश्यक आहे.
8 / 12
या योजनेंतर्गत जर कुणी कर्मचारी बेरोजगार झाला तर तो कमाल ९० दिवसांसाठी या भत्त्याचा लाभ मिळवण्यास पात्र राहील. अशा कर्मचाऱ्याला तीन महिन्यांच्या सरासरी पगाराच्या ५० टक्के रकमेचा दावा करता येईल. यापूर्वी ही मर्यादा २५ टक्के होती.
9 / 12
या नियमामध्ये अजून एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे यापूर्वी बेरोजगारी भत्ता मिळवण्यासाठी ९० दिवसांनंतर लाभ घेता येत असे. मात्र आता हा कालावधी घटवून ३० दिवसांचा करण्यात आला आहे. ही माहिती कामगार आणि रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली आहे.
10 / 12
मिळालेल्या माहितीनुसार जे कर्मचारी एका मर्यादेपर्यंत कमाई करतात त्यांच्यासाठी ईएसआय स्कीम लागू होते. त्यांचा पगार जग २१ हजारांपर्यंत असेल तरच ही योजना लागू होते. ईएसआयअंतर्गत देशातील सुमारे ३.५ कोटी कुटुंबांचा समावेश आहे. त्याअंतर्गत सुमारे १३.५ कोटी लोकांना कॅश आणि वैद्यकीय सुविधा मिळतात.
11 / 12
जुलै २०१९ मध्ये सरकारने ईएसआयमधील अंशदान घटवले होते. याअंतर्गत कंपन्यांचे योगदान ४.७५ टक्क्यांवरून घटवून ३.२५ टक्के करण्यात आले होते . तर कर्मचाऱ्यांचे योगदान १.७५ टक्क्यांवरून घटवून ०.७५ टक्के करण्यात आले होते.
12 / 12
जाणकारांच्या मते सरकारच्या या पावलाचा लाभ सुमारे ४० लाख कर्मचाऱ्यांना होईल. कोरोनाची साथ विचारात घेता ईएसआयसी बोर्डाने आपल्या रुग्णालयातील आयसीयू वॉर्ड वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण बेडपैकी १० टक्के बेड हे आयसीयू, एचडीयूच्या रूपात असतील.
टॅग्स :Employeeकर्मचारीUnemploymentबेरोजगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार