Bisleri ची गोष्ट पुन्हा बिघडली? अचानक मोठा निर्णय, मुलगी जयंती ऐवजी आता यांच्याकडे कंपनीची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 07:51 IST2023-03-22T07:38:58+5:302023-03-22T07:51:53+5:30
रिपोर्टनुसार हे पूर्वनियोजित नसून अचानक अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागला.

टाटा समूहासोबतचा (Tata Group) करार रद्द झाल्यानंतर रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान (Jayanti Chauhan) आता देशातील पॅकेज्ड वॉटर क्षेत्रातील दिग्गज बिस्लेरीची जबाबदारी घेणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. परंतु त्यांच्यादरम्यान ही गोष्ट पुढे सरकल्याचं दिसत नाही. एका रिपोर्टनुसार कंपनीची कमान कंपनीचे सीईओ अँजेलो जॉर्ज (Angelo George) यांच्या हातात असेल.

बिस्लेरी कंपनी चालवण्याची जबाबदारी कोणी घ्यायची यावरून रमेश चौहान आणि जयंती चौहान यांच्यात मतभेद समोर येत आहेत. जयंती यांची व्यवसाय सांभाळण्याची इच्छा नसल्यामुळे रमेश चौहान यांनी आता कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्याकडे सोपवली आहे. रिपोर्टनुसार, हे पाऊल पूर्वनियोजित नव्हतं, याचा अर्थ असा निर्णय अचानक घ्यावा लागला.

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनी आधीच 'हिमालयन' ब्रँड अंतर्गत बाटलीबंद पाण्याची विक्री करते. याशिवाय, टाटा कॉपर प्लस वॉटर आणि टाटा ग्लुकोप्लस या ब्रँडचीही मालकी आहे. टीसीपीएलनं बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय मजबूत करण्यासाठी बिस्लेरी ब्रँडमध्ये भाग घेण्यासाठी चर्चा सुरू केल्याचं सांगितलं जात होतं.

मात्र, त्यानंतर बिस्लेरी अधिग्रहणाचा करार रखडला. टाटासोबत बिस्लेरीचा करार जवळपास अंतिम टप्प्यात होता, पण ही प्रक्रिया ठप्प पडली. मात्र, दोघांमधील बोलणी बंद झाल्यामुळं हा करार होणार नसून कंपनीची धुरा रमेश चौहान यांची मुलगी जयंती सांभाळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु यात त्यांना स्वारस्य नसल्यानं आता कंपनीची जबाबदारी अँजेलो जॉर्ज साभाळतील.

बिस्लेरी ही बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायातील सध्याच्या काळातील आघाडीची कंपनी आहे. पण रमेश चौहान यांची मुलगी जयंती व्यवसायात लक्ष घालत नसल्यानं रमेश चौहान यांनी कंपनी विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला होता असं सांगण्यात येत होतं.

देशात बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ २० हजार कोटी रूपयांची असून त्यापैकी ६० टक्के हिस्सा असंघटित आहे, ज्यामध्ये बिस्लरीचा वाटा ३२ टक्के आहे. अशा स्थितीत ही कंपनी टाटांनी झोळीत पडली असती तर बाजारातील टाटांचे वर्चस्व आणखी वाढू शकलं असतं, असं सांगितलं जात आहे.

४२ वर्षीय जयंती चौहान सध्या बिस्लेरीच्या उपाध्यक्षा आहेत. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या कंपनीत मदत करायला सुरुवात केली. मात्र, गेल्या काही काळापासून कंपनीला पुढे नेण्यासाठी त्या खूप सक्रिय होत्या. त्या आपल्या लिंक्डइन प्रोफाईलवरुन कंपनीला प्रमोट करत असतात.

अलीकडेच, कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ॲपवरून पाणी ऑर्डर करण्याची सुविधा सुरू केली आहे. ही माहिती खुद्द जयंती यांनी आपल्या लिंक्डइन प्रोफाइलवर शेअर केली होती. याशिवाय बिस्लेरीनं आयपीएल टीम मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्ससोबतही करार केला आहे.

















