सत्य, त्रेता आणि द्वापरयुगात बाप्पाने घेतला होता अवतार; पण कलियुगाचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 03:23 PM2021-02-10T15:23:25+5:302021-02-10T15:33:21+5:30

आपल्या सर्वांचे लाडके दैवत म्हणजे बाप्पा! त्याला आपण अनेक नावांनी ओळखतो. सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्नविनायक, विनायक, धुमकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र आणि गजानन अशी १२ नावे आहेत. त्याच्या प्रत्येक नावामागे एक आख्यायिका आहे. इथे आपण त्याच्या जन्मकथांबद्दल जाणून घेऊया.

सत्यायुगात कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी आदिती यांच्या उदरी बाप्पाने महोत्कट विनायक या नावाने जन्म घेतला. तोच आपण माघी गणेशोत्सव या नावे उत्सव साजरा करतो. या अवतारात, बाप्पाने देवांतक आणि नरांतक या राक्षसांचा वध केला, धर्म स्थापित केला आणि अवतार संपविला. या युगात गणेशाचे वाहन सिंह होते

त्रेता युगात, गणपतीचा जन्म भद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी झाला. त्याचे नाव गुणेश ठेवले गेले. त्रेता युगात त्याचे वाहन मयूर होते, म्हणून त्याला मयुरेश्वर अशी ओळख मिळाली. या अवतारात, बाप्पाने सिंधू नावाच्या राक्षसाचा नाश केला आणि ब्रह्मदेव कन्या, सिद्धि आणि रिद्धी यांच्याशी लग्न केले.

द्वापर युगात बाप्पाचे सिंदूर चर्चित रूप होते. या अवतरात त्याने सिंदुरसुरचा वध केला आणि त्याने कैद केलेल्या अनेक राजांना आणि वीरांना सोडवले. असे म्हणतात, की पराशर ऋषींच्या वंशात बाप्पाने हा जन्म घेतला. तसेच गजमुख नामक दैत्याचा वध केला व त्याचे नाव धारण करून भक्ताचा उद्धार केला.

त्यानंतर येते कलियुग! वरील तिन्ही युगांमध्ये बाप्पा भक्तांच्या रक्षणार्थ धावून गेला. कलियुगात भक्त बाप्पाला आग्रहाने घरी बोलावू लागला. बाप्पा त्याच्या विनंतीला भूलुन आलासुद्धा! लोकमान्य टिळकांनी सामाजिक गरज लक्षात घेता बाप्पाचा उत्सव सार्वजनिक केला. मंडपाच्या व्यासपीठावरून व्याख्यान, गाणी, समाजभान, समाजप्रबोधन इ. उपक्रम चालत असत. परंतु, अलीकडच्या काळात गणेशोत्सवाचे होणारे डीजेमय बीभत्स रूप पाहता, कलियुगात बाप्पा अवतार घेईल याची शाश्वती वाटत नाही. तरीदेखील बाप्पा या न त्या स्वरूपात भक्तांच्या भेटीला धावून येतो, हेच खरे!