Ritual: अंत्य संस्कार हे सोळा संस्कारांपैकी एक, पण ते महिलांनी करू नये असा शास्त्रसंकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:36 IST2025-07-18T15:25:04+5:302025-07-18T16:36:25+5:30

Ritual: सद्यस्थितीत स्त्रिया स्मशानात जातात, अंत्य संस्कारही करतात. मात्र पूर्वी स्त्रियांना स्मशानात जाण्यावर बंदी होती. कोणाच्याही पार्थिवाचे दर्शन घ्यायचे असल्यास ते घराच्या उंबरठ्यापर्यंतच घेता येत असे. ही मर्यादा का आखली गेली? त्यामागचे कारण काय? जाणून घेऊया.

हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीचे निधन झाले असता त्याच्या पार्थिवावर दहन विधी केले जातात. लहान मूल गेले असता त्याचा दफन विधी केला जातो. त्याबरोबरच इतरही विधी असतात. मात्र त्या अंत्यविधीत कुठेही बायकांचा समावेश नसतो किंवा स्मशानातही त्यांना प्रवेश दिला जात नाही. यामागचे कारण जाणून घेऊ.

हिंदू धर्मात असे अनेक नियम आहेत आणि यापूर्वीही होते, जे वरकरणी पाहता स्त्रियांवर बंधन स्वरूप वाटतात, मात्र त्यामागचा आशय समजून घेतला, तर जाचक वाटणाऱ्या नियमामागील विचार लक्षात येतो. म्हणून केवळ विरोधाला विरोध न करता, आपल्या पूर्वसुरींनी घेतलेले निर्णय कोणत्या दृष्टिकोनातून घेतले होते, याचा अभ्यास, विचार आणि चिंतन व्हायला हवे.

महिला कणखर असतात, पण पुरुषांच्या तुलनेत त्या संवेदनशील आणि भावुक असतात. प्रकृतीने केलेली ही रचना असते. मनावर आघात होईल अशा कोणत्याही गोष्टी त्या दीर्घकाळ विसरू शकत नाहीत. म्हणूनच अंत्यविधी त्यांनी पाहू नयेत असे शास्त्र संकेत आहेत.

मृत्य व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती तेराव्या दिवशी मुंडन करते. हा एक प्रकारे समाजात शोक संदेश देण्याचा प्रकार होता. व्यक्तीचे मुंडन पाहून बघणाऱ्या व्यक्तीला ती व्यक्ती शोकाकुल स्थितीत असल्याचे लगेच कळत असे. मात्र स्त्रियांचे मुंडन करण्याचा प्रघात हिंदू धर्मात नाही. केशवपन प्रथेमागे वेगळी कारणे होती. मात्र अंत्यविधी झाल्यावर तेराव्याला स्त्रियांनी मुंडन करणे शास्त्रसंमत नाही. म्हणूनही स्त्रियांना स्मशानात प्रवेश नाकारला जात असे.

वर उल्लेख केल्यानुसार अंत्यविधीचा आघात स्त्रियांना मानवणार नाही हे एक कारण आणि दुसरे कारण म्हणजे जबाबदारीची विभागणी! पूर्वी पुरुष घराबाहेरील जबाबदाऱ्या सांभाळत आणि स्त्रिया घराच्या आत! एखाद्या घरी दुःखद प्रसंग घडला असता सांत्वन करण्यासाठी लोक येत ते स्त्रियांना भेटत असत, कारण पुरुष मंडळी दहावा, बारावा, तेरावा विधींमध्ये व्यग्र असत.

तेरावा झाल्यावर वास्तू शुद्धी केली जाते आणि मृत व्यक्तीचा परिवार सुतकातून मुक्त होत असे. सगळ्यांचे बंधन संपून व्यक्तींसकट घराचीही शुद्धी केली जाते. तोवर शोक ओसरलेला असतो, त्यामुळे दहावा, बारावा, तेरावा तसेच वर्षश्राद्ध प्रसंगात स्त्रियांना पुनश्च सहभागी करून घेतले जाते.