Pitru Paksha 2021 : श्राद्धाचा स्वयंपाक आदर्श स्वयंपाक का मानला जातो, त्यातील पदार्थांचा क्रम कसा असावा ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 02:30 PM2021-09-20T14:30:03+5:302021-09-20T14:46:58+5:30

Pitru Paksha 2021 : श्राद्धाच्या दिवशी तयार करण्यात येणारा स्वयंपाक हा अतिआदर्श मानला जातो. वास्तविक असा स्वयंपाक वर्षभर केला जाणे आवश्यक असते. पण वर्षभर नाही तरी किमान श्राद्धादिवशी तरी आदर्श स्वयंपाक असावा, अशी किमान अपेक्षा असते. कारण त्यात हर तऱ्हेच्या रसांचा खाद्यपदार्थात समावेश असतो. हे सर्व रस आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असतात. परंतु एवढे पदार्थ रोज करायला आता कोणाकडे वेळ नाही, म्हणून वर्षातून एक दिवस तरी हा परिपूर्ण स्वयंपाक करावा.

श्राद्धदिनी डावा, उजवा, समोरील व मध्य अशा चारी भागातील पदार्थ सांगितले आहेत. त्यालाच आपण चौरस स्वयंपाक म्हणतो. एरव्ही आपण ताटात मीठ, लिंबू, चटणी वाढून सुरुवात करतो, परंतु श्राद्धाच्या पानात मीठ सर्वात शेवटी आणि लागणार असेल तरच वाढतात.

श्राद्धाचे जेवण ज्या पानावर वाढले जाते, त्याला तूप लावून मग त्यावर सगळे जिन्नस वाढले जातात. तूपामुळे सर्व रसांचे व्यवस्थित पाचन व्हावे हा त्यामागचा हेतू असतो.

एरव्ही वाढलेल्या ताटाचा नैवेद्य दाखवताना आपण उजवीकडून डावीकडे ताटाभोवती पाणी फिरवत नैवेद्य दाखवतो, परंतु श्राद्धाच्या पानाचा नैवेद्य दाखवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवून नैवेद्य दाखवला जातो. आता श्राद्धाच्या ताटात कोणते पदार्थ कसे आणि कुठे वाढले पाहिजेत, ते पाहू!

डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर, कोचकय, आमसुलाची चटणी हे पदार्थ असावेत.

उजवीकडे खीर, पालेभाजी, फळभाजी हे पदार्थ असावे.

समोर आमटी, कढी, पापड, कुरडई, भजी, उडदाचे वडे (माषवटक) हे पदार्थ असावेत.

मध्यभागी पोळी, पुरी, पक्वान्न, दूध, दहीसाखर हे पदार्थ असावेत.

अशा पानाचा नैवेद्य दाखवून कावळ्याचा अन्नाला स्पर्श झाला की मगच आपणही या सर्व रसांनी युक्त असलेल्या भोजनाचा आस्वाद घेऊन तृप्त व्हावे, हा या श्राद्धाच्या स्वयंपाकाचा हेतू असतो.