By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 20:46 IST
1 / 12मराठी वर्षात चातुर्मासाला अत्याधिक महत्त्व आहे. संपूर्ण वर्षभरात येणारे बहुतांश महत्त्वाचे सण आणि उत्सव, व्रत-वैकल्ये याच कालावधीत येतात. यंदाच्या वर्षी मंगळवार, २० जुलै २०२१ पासून चातुर्मासाला सुरुवात होईल आणि सोमवार, १५ नोव्हेंबर २०२१ रोजी चातुर्मासाची समाप्ती होईल. 2 / 12आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीपासून ते कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीपर्यंतचा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो. श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असे चार महिने या चातुर्मास कालावधीत येतात. (significance of chaturmas)3 / 12चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून, त्याचा संबंध जीवनशैलीशी संबंधित आहे. ऋतुचक्राशी निगडीत असणारे हे सण, व्रत एकूणच सात्त्विकतेशी जोडलेले आहेत. चातुर्मास काळात आपला आहार कसा असावा, याबाबतही सांगण्यात आले आहे. 4 / 12आपल्याकडील अनेक सण-उत्सव निसर्गचक्रानुसार साजरे करण्याची परंपरा आहे. याची वैज्ञानिक बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. आषाढ महिन्यातील पावसाचे रौद्र रूप धडकी भरविणारे असते. पुढे श्रावणात पावसाचा जोर कमी होऊन ऊन-पावसाचा खेळ रंगतो. 5 / 12श्रावण महिन्यापासूनच पुढे भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक महिन्यापर्यंत आपल्या संस्कृतीत सण, उत्सव यांची रेलचेल असते. हाच उत्सव आपण ‘चातुर्मास’ म्हणून साजरा करतो. हिंदू संस्कृतीत व्रत-वैकल्ये, उपास, पूजापाठ, अनुष्ठान, पारायण आदींसाठी हा चार महिन्यांचा कालावधी पवित्र आणि महत्त्वाचा समजला जातो.6 / 12ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवसांत सूर्य कर्क राशीत असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत जी काही व्रत-वैकल्ये, सर्व सण-उत्सव हे भारतीय ऋतुचक्राशी निगडीत आहेत. याची सांगड आपले दिनचर्या, आहार-विहार यांच्याशी आपल्या पूर्वसुरींनी घालून ठेवली आहे. त्याचा संबंध आरोग्याशीही आहे. ऋषी-मुनींनी त्या त्या ऋतुमानात आपण कसे वागायचे, याची सांगड सण-उत्सव आणि आपल्या आरोग्याशी घातली आहे.7 / 12पावसाळ्याच्या कालावधीत आपली पचनशक्ती मंद झालेली असल्याने या काळात पचण्यास हलका आणि कमी आहार घ्यावा असे सांगितले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेदही ते मान्य करतो. चातुर्मासाच्या काळात तुळशीची पूजा आणि प्रदक्षिणाही व्रत म्हणून करावी, असे सांगितले आहे. तुळस ही कफ, वातशामक, जंतुनाशक आहे. पावसाळ्याच्या दिवसात होणारी सर्दी, खोकला, ताप आदी आजारांवर तुळस हे रामबाण औषध आहे.8 / 12श्रावण महिन्यातील मंगळागौरी देवीची पूजा झाल्यानंतर रात्री विविध खेळ खेळून जागविली जाते. या खेळात फुगड्या, झिम्मा, पिंगा आणि अन्य काही खेळ असतात. महिलांच्या शारीरिक आरोग्यासाठी हे सर्व खेळ पूरकच आहेत. 9 / 12भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी ‘पत्री’ म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पाने लागतात. या सर्व औषधी असून शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आणि सार्वजनिक आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयुक्त आहेत. गणपतीसाठी लागणाऱ्या पूजेच्या निमित्ताने का होईना या वनस्पतींचे जतन आणि संवर्धन होईल, असा उद्देश या मागे होता.10 / 12श्रावण महिना म्हणजे पावसाचा मध्य. या काळात आपल्या पोटातील अग्नी मंद झालेला असल्याने व्रत-वैकल्य, उपास याच्या माध्यमातून आपले आरोग्य सांभाळणे हा या चातुर्मासाचा मुख्य उद्देश. या दिवसात कमीतकमी आणि पचायला हलके असा आहार घ्यावा. अश्विन महिना म्हणजे पावसाळा संपून थंडीची चाहूल लागलेली असते. 11 / 12पावसाळ्यात मंद झालेल्या अग्नीला पुन्हा प्रज्वलित करण्याचा हा काळ असतो. कमकुवत झालेले शरीर बलवान करायचे असते. त्याची सुरुवात म्हणून या दिवसात एक धान्य फराळ, जे धान्य खाल ते भाजून खा, शक्तीचा संचय करा, असे सांगितले जाते. अश्विन महिन्यात आणि शरद ऋतूत येणाऱ्या या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. 12 / 12या काळात थंडीला सुरुवात झालेली असल्याने कफविकार वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी चंद्रप्रकाशात ठेवलेले आटीव गरम दूध पिऊन आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले आहे. चातुर्मासाच्या काळात कांदा, लसूण यांचे सेवन करू नये, असे सांगितले जाते. कांदा आणि लसूण पचायला जड आहेत. पचनशक्ती मंद झाल्याने तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणेही आरोग्यासाठीही चांगले नाही. त्यामुळेच पूर्वजांनी या चार महिन्यांत कांदा, लसूण खाऊ नका, असे सांगितले आणि त्याला धार्मिकतेची जोड दिली.