६० हजार हेक्टरवरील पिकांसाठी सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST2021-02-24T04:18:46+5:302021-02-24T04:18:46+5:30
येलदरी धरणात यावर्षी १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यातील ...

६० हजार हेक्टरवरील पिकांसाठी सोडले पाणी
येलदरी धरणात यावर्षी १०० टक्के पाणीसाठा झाला. त्यामुळे या धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यातील पिकांना भविष्यात पाणी सोडले जाईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार येलदरी धरण प्रशासनाकडून पाणी पाळ्याचे नियोजनही करण्यात आले होते. त्यानुसार या धरणातून उन्हाळी हंगामातील भूईमुग, ऊस यासह रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू या पिकांसाठी पाण्याचे दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी येलदरी धरणातून सिद्धेश्वर धरणात नदीवाटे नेले जात आहे. सिद्धेश्वर धरणातून पूर्णा मुख्य कालवा, हट्टा शाखा कालवा, लासिना शाखा कालवा, वसमत शाखा कालवा व अंतिम शाखा कालवा या५ कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जलसंपदा विभाग नियोजन केले आहे. या पाच कालव्यामधून परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील ५७ हजार ९८८हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. २३फेब्रुवारी रोजी सोडलेल्या पाण्यामुळे या भागातील शेतीसह तीन जिल्ह्यातील २५० हून अधिक गावांना देखील भर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. त्याच बरोबर परभणी, हिंगोली, पूर्णा, वसमत व जिंतूर या मोठ्या शहरांचाही समावेश आहे. त्यामुळे या पाण्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांमधून शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे.
१५ मेगावॅट वीज निर्मिती
येलदरी येथील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ५७ हजार ९८८ हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे. त्याच बरोबर आतापर्यंत येलदरी येथील जलविद्युत केंद्राने या पाण्याच्या माध्यमातून १५ मेगावॅट एवढी वीज निर्मिती केली आहे. त्यामुळे शेती सिंचनाबरोबरच वीज निर्मितीही होत आहे.
‘‘ यावर्षी येलदरी धरण १०० टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात झालेल्या नैसर्गिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी मोठी संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोडलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा. तसेच ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करुन पाण्याची बचत करावी.
-एस.के.सबनीवार, अधीक्षक अभियंता नांदेड मंडळ