विनामास्क फिरणाऱ्या ६१ नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST2021-02-24T04:18:51+5:302021-02-24T04:18:51+5:30
सेलू : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून रूग्णांची संख्या वाढत असल्याने पोलीस प्रशासन आणि नगर पालिकेच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या ...

विनामास्क फिरणाऱ्या ६१ नागरिकांना दंड
सेलू : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून रूग्णांची संख्या वाढत असल्याने पोलीस प्रशासन आणि नगर पालिकेच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्या ६१ नागरिकांवर २ दिवसात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
एका आठवड्यापासून शहर, जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. शासनाने दिलेल्या सूचनेनुसार नागरिक पालन करत नसल्याने सोमवारपासून पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्या प्रशासनाने विविध भागात पथक स्थापन केले आहेत. या पथकाकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी २०० रूपये प्रमाणे दंड करण्यात येत आहे. सोमवारी शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या क्रांती चौकात पथकाने विनामास्क फिरणाऱ्या ३१ जणांवर दंडात्मक कारवाई करत ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. तर मंगळवारी जिंतूर काॅर्नर या ठिकाणी ३० जणांवर दंडात्मक कारवाई करत ६ हजार रुपये वसूल केले आहेत. दोन दिवसात विना मास्क फिरणाऱ्या ६१ नागरिकांना दंड करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, सरला गाडेकर तसेच पालिकेचे उपमुख्याधिकारी अक्षय पल्लेवाड, जी. बी. जोशी, दीपक मापारी यांचा पथकात समावेश आहे. दरम्यान, पुन्हा एकदा विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होत असल्याने मास्क विक्रीत वाढ झाली आहे.