परभणी : महिनाभरापासून १६ गाव पाणीपुरवठा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 23:45 IST2019-06-29T23:45:06+5:302019-06-29T23:45:27+5:30

जिंतूर तालुक्यातील कौसडी गावाला पाणीपुररवठा करणारी १६ गाव पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांमुळे महिनाभरापासूून बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. दोन विभागाच्या वादात येथील पाणीपुरवठा बंद असल्याचे समोर येत आहे.

Parbhani: 16 village water supply schemes closed for the month | परभणी : महिनाभरापासून १६ गाव पाणीपुरवठा योजना बंद

परभणी : महिनाभरापासून १६ गाव पाणीपुरवठा योजना बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील कौसडी गावाला पाणीपुररवठा करणारी १६ गाव पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांमुळे महिनाभरापासूून बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. दोन विभागाच्या वादात येथील पाणीपुरवठा बंद असल्याचे समोर येत आहे.
जिंतूर तालुक्यातील कौसडी हे १० ते १२ हजार लोकसंख्येचे गाव असून या गावाची तहान भागविण्यासाठी १६ गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होतो. जिंंतूर तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असतानाही १६ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत असलेल्या गावांना मूबलक पाणी मिळत होते. या योजनेंतर्गत कौसडी, बोरी, कान्हड, हट्टा, कुपटा यासह अन्य गावांना पाणीपुरवठा केला जातो; परंतु, मागील काही दिवसांपासून या योजनेला नादुरुस्तीचे ग्रहण लागले आहे.
कधी वीजपुरवठा खंडित होतो तर कधी विद्युत मोटार जळते. त्याचबरोबर सद्यस्थितीत या योजनेच्या जलवाहिनीला गळती लागली आहे. ही गळती दुरुस्त केल्याशिवाय पाणीपुरवठा होणार नाही. मागील महिनाभरापासून गळती दुरुस्तीअभावी या योजनेंतर्गत पाणीपुरवठा बंद आहे. ही गळती दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैसा नाही. या योजनेंतर्गत दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीेने जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाकडे २५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाचा प्रस्ताव तयार करून पाठविला आहे; परंतु, अद्यापही हा पैसा ग्रा.पं.ला मिळाला नाही. त्यामुळे दुरुस्तीअभावीे पाणीपुरवठा बंद आहे. किरकोळ दुरुस्तीअभावी ग्रामस्थांना दोन ते तीन कि.मी. पायपीट करीत पाणी आणावे लागत आहे.
दुरुस्तीची कामे तत्काळ करून गावांना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी कौसडी ग्रामस्थांच्या वतीने २८ जून रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली होती. निवेदनावर शेख रहीम शेख शिकूर, हरिभाऊ खैरे, सोनाजी जिवने, सय्यद कदीर, शेख गुलाब नबी, शेख नसीर, भगवान कुटे, आनंदा इखे, चंद्रकांत कुलकर्णी, आनंद हराळे, नारायण काळे, शेख सलीम, महादू तायडे, दत्ता काळे, बाळासाहेब जिवने, विनायक ढवळशंख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, एकीकडे राज्य शासन कोट्यवधी रुपयांचा खर्च करून ग्रामस्थांना पाण्याची सुविधा करून देत आहे. तर दुसरीकडे किरकोळ दुरुस्तीअभावी ग्रामस्थांना पायपीट करीत पाणी आणावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
ग्रामसेवक नसल्याने कामे रखडली
कौसडी ग्रामपंचायतीला मागील महिनाभरापासून ग्रामसेवक नसल्याने ग्रा.पं.ची अनेक कामे रखडली आहेत. १६ गाव पाणीपुरवठा योजना केवळ एका लिकेजमुळे बंद आहे. ग्रामसेवकाचे पद रिक्त असल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यामुळे ग्रामसेवकाची तत्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी जिंतूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Parbhani: 16 village water supply schemes closed for the month