'डीपीडीसीची कामे अन् पक्षातील बढतीचा शब्द अखेर कामी'; परभणीत ७८ उमेदवारांची माघार
By मारोती जुंबडे | Updated: January 27, 2026 19:36 IST2026-01-27T19:36:22+5:302026-01-27T19:36:56+5:30
Parabhani ZP Election 2026:स्वपक्षाविरोधात बंडखोरी करून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी पक्षनेत्यांनी अखेरचे प्रयत्न केल्याचे चित्र होते.

'डीपीडीसीची कामे अन् पक्षातील बढतीचा शब्द अखेर कामी'; परभणीत ७८ उमेदवारांची माघार
- मारोती जुंबडे
परभणी : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. जिल्हा परिषदेच्या दहा गटांसह पंचायत समितीच्या २० गणांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद निवडणुकीतून ३२, तर पंचायत समिती निवडणुकीतून ४६ अशा एकूण ७८ उमेदवारांनी माघार घेतली.
स्वपक्षाविरोधात बंडखोरी करून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी पक्षनेत्यांनी अखेरचे प्रयत्न केल्याचे चित्र होते. शासकीय समित्यांवर स्थान, पक्षातील महत्त्वाची पदे तसेच डीपीडीसीअंतर्गत विकासकामे मिळवून देण्याची आश्वासने देत बंडखोरांना माघारीसाठी राजी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या सर्व हालचाली मंगळवारी परभणी तहसील कार्यालय परिसरात ठळकपणे पाहायला मिळाल्या. आत्ता माघार घ्या, पुढील काळात संधी दिली जाईल हा जुना राजकीय फॉर्म्युला यावेळी यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. कामे आणि पक्षातील बढतीचा शब्द कामी आल्याने अनेक बंडखोर उमेदवारांनी अखेर माघार घेतल्याचे चित्र दिसून आले.
झरी, पिंगळी, सिंगणापूर, पोखर्णी गटांत पक्षीय उमेदवारांची माघार
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी झरी, पिंगळी, सिंगणापूर व पोखर्णी परिसरात पक्षीय समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. विविध पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने संबंधित गट व गणांतील निवडणूक लढतींचे चित्र बदलले आहे.
झरी पंचायत समिती गण व साडेगाव पंचायत समिती गणातून शिंदेसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्याचप्रमाणे पिंगळी जिल्हा परिषद सर्कलसह पंचायत समिती गणातून उद्धवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली. दरम्यान, सिंगणापूर जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष व शिंदेसेनेच्या उमेदवारांनी माघार घेतली असून, पोखर्णी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतली आहे. या माघारीमुळे संबंधित गट व गणांमध्ये निवडणूक लढत नव्याने रंगण्याची शक्यता असून आता अपक्ष उमेदवारांना पक्षीय पाठिंबा दिला जाणार की अधिकृत नावाने निर्णय जाहीर केला जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीतून ३२ जणांची माघार
जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरलेल्या ३२ अपक्ष उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली. यामध्ये झरी जिल्हा परिषद सर्कलमधून १, टाकळी बोबडे ४, टाकळी कुंभकर्ण ६, पेडगाव २, जांब १, पिंगळी ३, सिंगणापूर ३, पोखर्णी ३, लोहगाव २ तर दैठणा जिल्हा परिषद गटातून २ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता दहा जिल्हा परिषद गटांसाठी ५६ उमेदवार रिंगणात आहेत.
पंचायत समिती निवडणुकीतून ४६ जणांची उमेदवारी परत
जिल्हा परिषद पाठोपाठ पंचायत समिती निवडणुकीतूनही मंगळवारपर्यंत ४६ उमेदवारांनी माघार घेतली. यामध्ये झरी पंचायत समिती गणातून ४, साडेगाव ५, नांदगाव १, टाकळी कुंभकर्ण ९, नांदापूर ५, पेडगाव १, आर्वी २, जांब २, पिंगळी ३, असोला १, ब्राह्मणगाव १, पोखर्णी २, ब्रह्मपुरी १, लोहगाव २, उखळद २ तर धसाडी पंचायत समिती गणातून एक उमेदवार माघारी फिरला आहे. त्यामुळे आता पंचायत समितीच्या गणांमध्ये ९३ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
अधिकृत उमेदवारांचा मार्ग मोकळा
या माघारीमुळे अनेक गट व गणांमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. अखेर आश्वासनांची रणनिती यशस्वी ठरल्याने अधिकृत उमेदवारांनी सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे चित्र असून, परभणी तालुक्यातील निवडणूक रणधुमाळी आता अधिकच चुरशीची होत चालली आहे.